गेल्या काही कालावधीपासून भारतीय संघ अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. या संघाला अशा अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता आहे, जो तुफान फटकेबाजी करेल आणि गोलंदाजी करताना गडी देखील बाद करून देईल. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी एक असा खेळाडू आहे, जो लक्षवेधी कामगिरी करत आहे. ज्याला हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून देखील पहिले जाऊ लागले आहे.
सध्या सर्वत्र विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेचे वारे परसले आहे. या स्पर्धेत युवा खेळाडू अप्रतिम कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यापैकीच एक म्हणजे मध्यप्रदेश संघाचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर. त्याची बॅट या स्पर्धेत आग उकळतेय. त्याने आतापर्यंत या स्पर्धेत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. यासह त्याने ५ गडी देखील बाद केले आहेत.
त्यामुळे, त्याची अशी अप्रतिम कामगिरी पाहून भारतीय संघाला हार्दिक पंड्याची उणीव भरून काढणारा खेळाडू मिळाला आहे. असे मत अनेकांनी मांडले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यावर व्यंकटेश अय्यरला संधी दिली जाऊ शकते.
मध्यप्रदेश आणि उत्तराखंड यांच्यात झालेल्या सामन्यात मध्यप्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३३० धावा केल्या होत्या. या सामन्यात मध्यप्रदेशकडून ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या व्यंकटेश अय्यरने ४९ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि ४ खणखणीत षटकार ठोकले, तर सलामीवीर फलंदाज अभिषेक भंडारीने १०६ आणि शुभम शर्माने ७० धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या उत्तराखंड संघाला ९ बाद अवघ्या २५३ धावा करण्यात यश आले होते.
व्यंकटेश अय्यरने या सामन्यात गोलंदाजी करताना १० षटकात ५८ धावा खर्च करत २ गडी बाद केले. यापूर्वी त्याने केरळ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील तुफान फटकेबाजी केली होती. त्याने ८४ चेंडूंमध्ये ११२ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले होते. तर महाराष्ट्र संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने १४ धावांची खेळी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
“२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराट खचलेला”; माजी प्रशिक्षकाचा धक्कादायक खुलासा
‘या’ फलंदाजाचा खराब फॉर्म सुरूच; भारतीय संघातील पुनरागमनावर प्रश्नचिन्ह