कोरोनाचा उदय झाल्यापासून व्यावसायिक क्रिकेट पूर्वीसारखे राहिलेले नाही. या जागतिक महामारीने क्रीडा जगतालाही ठप्प केले होते. परंतु, हळूहळू क्रिकेट खेळाने आपले पूर्वीचे स्थान प्राप्त केले आहे. मात्र, कोरोनामुळे काही मालिका आणि सामने आणि स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या किंवा रद्द कराव्या लागल्या. आयपीएल २०२१ (IPL 2021) मध्ये असेच काहीसे घडले. स्पर्धेचा अर्धा हंगाम भारतात खेळला गेला आणि नंतर काही महिन्यांनी अर्धा हंगाम युएईमध्ये आयोजित करण्यात आला. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, आम्हाला आयपीएल २०२२ (IPL 2022) भारतातच आयोजित करायची आहे.
कोरोनामुळे आयपीएल २०२१ आणि टी२० विश्वचषक भारतात आयोजित करता आला नाही. बीसीसीआयला दोन्ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित कराव्या लागल्या. आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हा वाईट टप्पा संपला असून भारतातील आगामी स्पर्धेला बाधा येणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना गांगुली म्हणाले, “मला वाटते की आम्ही ते पार केले आहे आणि सर्वात वाईट गोष्ट संपली आहे. आशा आहे की, आम्ही पुढच्या वर्षी आयपीएल भारतात परत आणू शकतो. कारण, ही भारताची स्पर्धा आहे. जेव्हा ती भारतात खेळली जाते तेव्हा वेगळे वातावरण असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू आहे. आम्ही न्यूझीलंडचे यजमानपद भूषवले. आम्ही दक्षिण आफ्रिकेला जाणार आहोत. त्यानंतर आम्ही वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला जाऊ. त्यामुळे मला वाटते की, हा वाईट काळ संपला आहे.
गांगुली पुढे म्हणाले, “भारताबाबत बोलाल तर मागील वर्षी एका अवकाशानंतर देशांतर्गत क्रिकेट खेळले गेलेले. पुढे जानेवारी महिन्यात रणजी ट्रॉफी सुरू होईल. ज्युनिअर क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्या गेल्या. सध्या विजय हजारे ट्रॉफी सुरू आहे. विशेष म्हणजे यात एकही कोरोना रूग्ण आढळला नाही.” यापूर्वीदेखील गांगुली यांनी आगामी आयपीएल भारतातच आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
जेव्हा एकट्या ‘युनिव्हर्स बॉस’ने ठोकलेले तब्बल 18 गगनभेदी षटकार
.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या ‘या’ दिग्गजांना नाही उंचावता आली रणजी ट्रॉफी