टी२० क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात छोटे स्वरुप आहे. या स्वरुपात अधिकतर फलंदाजांचा दरारा पाहायला मिळतो. विकेट गमावण्याची भिती न बाळगता अधिकाधिक चेंडूंना सीमारेषेपार पोहोचवण्याकडे फलंदाजांचा कल असतो. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल यात माहीर असल्याने त्याला ‘टी२० क्रिकेटचा स्पेशलिस्ट’ म्हटले जाते. नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध ताबडतोब अर्धशतक झळकावत त्याने टी२० स्वरुपातील १४ हजार धावांच्या मैलाचा दगड पार केला आहे.
तसे तर, गेलचा हा किर्तीमान मोडणे काही सोपे काम नाही. परंतु भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज सबा करीम यांना विश्वास आहे की, भारतीय कर्णधार विराट कोहली हा विक्रम तोडू शकतो.
गेलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात मैदानाच्या चहूबाजूंनी चौकार-षटकारांचा मारा करत ६७ धावांची ताबडतोब खेळी केली होती. केवळ ३८ चेंडूंमध्ये ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्य उभारली होती. या आक्रमक खेळीसह त्याने मागील ५ वर्षांपासूनचा अर्धशतकाचा दुष्काळ तर संपलवाच. सोबतच ट्वेंटी ट्वेंटी (आंतरराष्ट्रीय टी२०, इतर टी२० स्पर्धा) क्रिकेटमध्ये नव्या आणि ऐतिहासिक विक्रमाचीही नोंद केली आहे.
टी२० विश्वचषक २०१६मध्ये शेवटचे अर्धशतक केल्यानंतर हे त्याचे टी२० क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते. या अर्धशतकासह त्याने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आपल्या १४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तब्बल ४३१ ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये १४०३८ धावा करत तो ट्वेंटी ट्वेंटीत १४ हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे. ट्वेंटी ट्वेंटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत गेलनंतर कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण १०८३६ धावा केल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक १०७४१ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
‘रनमशीन’ कोहली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ३१० ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये ९९२२ धावा केल्या आहेत. अर्थात तो गेलपेक्षा जवळपास ५००० धावांनी मागे आहे. त्यामुळे त्याला गेलचा हा विक्रम करणे फार अवघड जाणार आहे. तरीही कोहलीमध्ये ही कठीण कामगिरी करण्याची क्षमता असल्याचा विश्वास सबा करीम यांना आहे.
इंडिया न्यूजशी याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “होय. विराट कोहली ख्रिस गेलच्या या आकड्यापर्यंत पोहोचू शकतो. परंतु यासाठी त्याला खूप टी२० सामने खेळावे लागणार आहेत. याखेरीज त्याला त्याच्या एक-दीड वर्षांपुर्वीच्या लयीत परत यावे लागेल. जर असे झाले तर तो नक्कीच गेलनंतर टी२० स्वरुपात १४ हजारी मनसबदार बनेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
स्म्रीतीचे अर्धशतक व्यर्थ, तिसऱ्या टी२०त इंग्लंडचा ८ विकेट्सने विजय; भारताने गमावली सलग चौथी मालिका
भारत, ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड नव्हे तर ‘हा’ संघ पटकावेल टी२० विश्वचषक- दीप दासगुप्ता
‘या’ ६ भारतीय धुरंधराचे श्रीलंका दौऱ्यावर उजळणार नशीब, मिळू शकते पदार्पणाची संधी