आयपीएल २०२२ बिझनेस एंडमध्ये असताना बीसीसीआयने मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सिरीजसाठी व इंग्लंडविरुद्धच्या एकमेव टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा केली. आयपीएल गाजवणाऱ्या काहींना टी२० टीममध्ये जागा मिळाली, तर इंग्लंडमध्ये मागील वर्षी राहिलेली एक टेस्ट खेळण्यासाठी पूर्ण ताकदीने टीम इंडिया उतरेल. त्या एका टेस्टसाठीच्या संघात सरप्राईज करतील अशी काही नावे सामील केली गेली नाहीत. मात्र, सामील नसलेल्या काही नावांनी नक्कीच सरप्राईज केलं. ते होते माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा.
भारतीय क्रिकेटची अनेक वर्षे सेवा करणाऱ्या या तिकडीची निवड न झाल्याने अनेक चर्चा घडू लागल्या आहेत. या तिघांना पुन्हा कधीच संधी मिळणार नाही का?, फक्त टेस्ट क्रिकेट खेळत असलेल्या या तिघांची आता त्या संघातूनही कायमचीच गच्छंती झाली का?, हे प्रश्न अनेक चाहत्यांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
हेही पाहा- रहाणे, ईशांत, साहा पुन्हा कधीच व्हाईट जर्सीत दिसणार नाहीत का?
मागील वर्षाच्या शेवटी विराट कोहली (Virat Kohli) याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरच टेस्ट टीमच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्यानंतर, भारतीय टेस्ट टीम चांगलीच चर्चेत आली होती. विराटनंतर पुढील कर्णधार म्हणून रोहित शर्मा, केएल राहुल व रिषभ पंत यांची नावे चर्चेत आली. मात्र, जस्ट त्या टूरवर जाण्याआधी आपले व्हाइस कॅप्टनपद गमावलेला अजिंक्य रहाणे अचानक स्पर्धेत मागे पडला होता. सततची खराब कामगिरी आणि टीम इंडियातील जागेवरील टांगती तलवार यामुळे रहाणेकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आलेले.
ज्या-ज्या वेळी विराट अनुपस्थित असेल, तेव्हा रहाणेने यशस्वीपणे नेतृत्व करत भारत टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाविरुद्धची धर्मशाला टेस्ट असो, नाहीतर २०२०-२०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन टेस्ट सीरिजमध्ये मात देण्याची ऐतिहासिक कामगिरी. कॅप्टन म्हणून रहाणेला नेहमीच मोठा बनवतात.
मात्र, याच ऑस्ट्रेलिया टूरवरील मेलबर्न टेस्टनंतर त्याचा बॅटिंगमधील फॉर्म गेला. दक्षिण आफ्रिका टूरवरच्या तिसऱ्या टेस्टपर्यंत त्याच्या मागच्या २० इनिंग्समधील हायेस्ट स्कोर होता ५८. इतकीच खराब कामगिरी म्हटल्यावर, शेवटी निवड समितीने मायदेशातील श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमधून त्याला बाहेर केले. आयपीएलमध्ये चांगलं करून तो पुन्हा टीम इंडियात येईल अशी सर्वांना आशा होती. मात्र, असे होऊ शकले नाही. खराब फॉर्मने साथ सोडली नाही आणि जोडीला दुखापत आली. आता जे संघात आहेत ते श्रेयस अय्यर, हनुमा विहारी चांगले खेळतायेत. रहाणेचं टीम इंडियासाठी खेळून झालंय का?, या प्रश्नाचे उत्तर द्यायचं, तर ते नाही येईल. कारण, वय त्याच्या बाजूने आहे. ३४ वर्षांचा रहाणे, पुन्हा एकदा डोमेस्टिक क्रिकेट गाजवून, अजिंक्य राहत टीम इंडियात नक्की जागा मिळवू शकतो.
जे स्थान बेस्ट बॅटिंग लाईनअपमध्ये रहाणेचे होतं, तेच स्थान बॉलिंग लाईन अपमध्ये इशांत शर्माच. २००८ पासून इशांत टीम इंडियाच्या बॉलिंग डिपार्टमेंटच प्रतिनिधीत्व करतोय. पहिल्याच ऑस्ट्रेलिया टूरवर पॉन्टिंग, हेडनसारख्या दिग्गजांच्या नाकात त्याने दम केला होता. २०१४ इंग्लंड टूरवर ऐतिहासिक लॉर्ड्स टेस्ट विनमध्ये त्याचाच सिंहाचा वाटा. आजही अनुभवाच्या बाबतीत टीम इंडियात तोच १०५ टेस्टसह पहिल्या नंबरवर. मात्र, संघातील जागा कोणाच्या मालकीची नसते हे खरे. दुखापती आणि खराब फॉर्म याच्यामुळे इशांतला. मागच्या वर्षीच्या साऊथ आफ्रिका टूरला जाता आले नाही. नंतर श्रीलंकेविरुद्धही त्याला संधी मिळाली नाही, आणि आता या एका टेस्टसाठी डावलले गेल्याने, त्याच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेय. इशांतचे वय अजूनही ३३च असले तरी फिटनेस सर्वात मोठा इश्यू आहे. दुसऱ्या बाजूला ढिगाने प्रतिभावान युवा वेगवान गोलंदाज तयार होत आहेत. असे असले तरी इशांतचे इंटरनॅशनल करिअर पूर्णपणे संपले आहे, असे कोणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही.
या तिघांपैकी सर्वात चर्चित नाव म्हणजे वृद्धिमान साहा. एकतर आपल्या उमेदीच्या वर्षात एमएस धोनी संघात असल्याने साहाला संधी मिळाली नाही. २०१४ पासून तो टीम इंडियाचा पर्मनंट मेंबर बनला. विकेटकिपिंग स्किलचा विचार केला तर त्याला आजही कोणी तोड नाही. मात्र, मागच्या दोन वर्षापासून रिषभ पंतचे आगमन झाल्यावर त्याची संघातील जागा गेली. तो अधूनमधूनच संघात दिसतो. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये त्याला जागा मिळाली नव्हती. त्या उद्विग्नतेतून त्याने राहुल द्रविड यांनी आपल्याला रिटायरमेंटच्या विचार करण्याचा सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट केला होता. मात्र, द्रविड यांनी पुर्ण विचारांती हा निर्णय सांगितल्याचे म्हटलेले. कारण साहा आता ३७ वर्षांचा झालाय, आणि २४ वर्षाच्या रिषभ पंतने स्वतःला टीम इंडियाचा नंबर वन विकेटकिपर म्हणून स्थापित केलेय. तसेच, बोर्ड आणि मॅनेजमेंट भविष्यासाठी केएस भरतला तयार करत आहे. त्यामुळे साहा आता पुन्हा एकदा टीम इंडियासाठी खेळण्याची शक्यता अगदीच कमी आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा
हेही वाचा-
‘दादा’नं क्रिकेटला फक्त युवी-भज्जी नाही, तर स्टीव स्मिथही दिलाय; कसं ते घ्या जाणून
ब्रेकिंग! सौरव गांगुलीने सोडले बीसीसीआयचे अध्यक्षपद? ट्विटरवरून दिले संकेत