कोरोना महामारीपासून बंद असलेल्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटच्या हंगामाची सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफीने सुरुवात होणार आहे. सर्वच राज्य क्रिकेट संघटना या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहेत. बऱ्याच राज्यांनी या स्पर्धेसाठी आपापल्या संघांची घोषणा देखील केली आहे. अशात भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पंजाब संघाकडून क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता होती. परंतु बीसीसीआयने त्याचे नाव फेटाळले आहे. त्यामुळे त्याच्या भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
सरावास देखील केली होती सुरुवात
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या युवराजने पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनीत बाली यांच्या विनंतीवरून आपल्या राज्याकडून खेळण्याच्या निर्णय घेतला होता. पुढे सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या ३० सदस्यीय संभावित पंजाब संघात त्याला स्थान मिळाले होते. त्यामुळे त्याने पंजाब क्रिकेट संघाच्या स्टेडियममध्ये सरावालाही सुरुवात केली केली होती. मात्र पंजाबच्या घोषित २० सदस्यीय संघात त्याला संधी न मिळाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही.
काय आहे बीसीसीआयचा नियम –
बीसीसीआयच्या नियमानुसार जो खेळाडू बीसीसीआय अंतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळतो, त्याला भारताबाहेरी अन्य लीग स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. जर एखाद्या खेळाडूला अन्य लीग स्पर्धांमध्ये खेळायचे असले तर त्याला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागते किंवा त्याने आंतरराष्ट्रीय तसेच बीसीसीआयच्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असावी.
याच कारणामुळे युवराजला पुन्हा भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे कठीण जाणार आहे. कारण त्याने जेव्हा निवृत्ती घेतली, त्यानंतर विविध लीग स्पर्धांमध्ये सहभागी झाला होता. त्यामुळे आता बीसीसीआयच्या नियमांनुसार तो बीसीसीआयच्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांसाठी पात्र नाही.
युवराज सिंगची क्रिकेट कारकिर्द
‘सिक्सर किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराजने २००० साली केनिया संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ३०४ वनड सामने खेळले असून ८७०१ धावा केल्या. सोबतच १११ विकेट्सही घेतल्या. टी२० क्रिकेटमध्ये ५८ सामने खेळत ११७७ धावा आणि २८ विकेट्सची कामगिरी केली. तसेच ४० कसोटी सामन्यात १९०० धावा आणि ९ विकेट्स घेतल्या.
मात्र जून २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळल्यानंतर पुन्हा त्याला संघात स्थान मिळाले नाही. तरीही २ वर्षे प्रतिक्षा केल्यानंतर अखेर २०१९मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती जाहीर केली.
पंजाबचा २० सदस्यीय संघ –
मनदीप सिंग (कर्णधार), गुरकीरत सिंग (उपकर्णधार), रोहन मारवाहा, अभिनव शर्मा, प्रभसिमरन सिंह, अनमोलप्रीत सिंह, अनमोल मल्होत्रा, संजीव सिंह, संदीप शर्मा, करण कैला, मयंक मारकंडे, अभिषेक शर्मा, रमनदीप सिंह, सिद्धार्थ कौल, बरिंदर शरण, अर्शदीप सिंह, हरप्रीत बराडड, बलतेज ढांडा, कृष्ण आणि गीतांश खेर
महत्त्वाच्या बातम्या-
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ जाहीर; अर्जुनला डच्चू, तर ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद
मुंबई संघाला मोठा झटका, दुखापतीमुळे श्रेयस अय्यर आगामी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून बाहेर