भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआय अध्यक्षपदावरून सुट्टी होणार आहे. 2019 मध्ये त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. आता त्यांची इच्छा नसताना देखील त्यांना हे पद सोडावे लागत आहे. भारताला 1983 मध्ये पहिला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघात सहभागी असलेले रॉजर बिन्नी आता बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष बनणार आहेत. गांगुलींच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआय नवीन उंची गाढेल अशी सर्वांना अपेक्षा होतीच, पण त्यांचा कार्यकाळ काही वादांमुळेही चर्चेत राहिला. आपण या लेखात अशाच चार वादांवर नजर टाकणार आहोत, जे गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना घडले.
1. विराट कोहलीसोबतचा वाद –
मागच्या वर्षी विराट कोहली (Virat Kohli) भारताच्या टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही काढून घेतले. सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सांगितल्याप्रमाणे बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी मिळून विरटविषयीचा हा निर्णय घेतला आहे. पण बोर्डाने त्याला टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नको, असे सांगितले होते. गांगुलींनी असेही सांगितले होते की, त्यांनी स्वतः विराटशी याविषयी चर्चा केली होती आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी अपीलही केली होती. पण विराटने कामाचा तान कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला, असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी, विराट कोहली मात्र गांगुलींच्या या वक्तव्याशी सहमत नव्हता.
काही दिवसांनंतर विराटने जेव्हा माध्यमांशी याविषयी चर्चा केली, तेव्हा गांगुलींची सर्व विधाने चुकीची असल्याचे स्पष्ट केले. विराटने स्पष्ट केले की, गांगुली किंवा बीसीसीआयने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला नव्हता. विराट म्हणाला की, “मी टी-20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय सर्वात आधी बीसीसीआयला सांगितला होता. त्यांनी ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे स्वीकार केली. कुणालाच काहीच अडचण वाटली नाही. कर्णधारपद सोडू नको, असे मला कुणीच म्हणाले नाही, उलट या निर्णयाचे कौतुक केले गेले.” विराटने हा खुलासा केल्यानंतर गांगुलीवर मोठ्या प्रमाणात टीका देखील केली गेली होती.
2. निवड समितच्या बैठकीत हस्तक्षेप केल्याचा आरोप –
सौगव गांगुलीवर अजून एक मोठा आरोप झाला होता तो म्हणजे निवड समितीच्या बैठकीत हस्तक्षेप केल्याचा. माध्यमांमध्ये अशा अनेक बातम्या समोर आल्या होत्या की, तो संघ निवडीमध्ये हस्तक्षेप करत असतात. गांगुलींनी हे आरोप कधी मान्य केले नसले तरी, त्यांचा एक फोटो मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत ते भारतीय संघाच्या निवडकर्त्यांसोबत बैठक पार पाडताना दिसत होते. असे असले तरी, गांगुलींना हा फोटो चुकीचा असल्याचे सांगत आरोप फेटाळले होते. या सर्व प्रकारांनंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका देखील केल्या होत्या.
3. रिद्धिमान साहा वाद –
भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) मुळेही सौरव गांगुली निशाण्यावर आले होते. चालू वर्षाच्या सुरुवातील भारताने श्रीलंकन संघासोबत कसोटी मालिका खेळली होती. सहाला या कसोटी संघातून वगळून केएस भरतला यष्टीरक्षकाच्या रूपात संघात घेतले गेले होते. याविषयी साहाने स्वतः नाराजी बोलून दाखवली आणि काही मोहत्वाचे खुलासेही केले. त्याने स्पष्ट केले की, मुख्य प्रसिक्षक राहुल द्रविडकडून त्याला निवृत्तीचा सल्ला मिळाला होता. तसेच न्यूझीलंडविरुद्ध जेव्हा त्याने 61 धावांची खेळी केली, तेव्हा गांगुलींनी स्वतः मेसज करून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. सोबत त्यांनी असेही सांगितले होते की, जोपर्यंत ते बीसीसीआयमध्ये आहेत, तोपर्यंत त्याला चिंता करण्याची गरज नाहीये. पण नंरत काही दिवसांमध्येच साहाला संघातून वगळले गेले. या सर्व प्रकरणानंतर चाहते आणि नेटकरी गांगुलींवर टीका करताना दिसले होते.
4. कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्ट्रेस्ट –
बीसीसीआय अध्यक्षाच्या रूपात कार्यरत असताना सौरव गांगुली यांनी माय 11 सर्कल या फॅन्टसी क्रिकेट ऍपचे प्रमोशन केले होते. त्यानी अनेकदा स्वतःच्या ट्वीटवरून याविषयी पोस्टही केली होती. दुसरीकडे बीसीसीआयने आणि ड्रीम 11 यांच्यात आधीपासूनच करार होता. गांगुलींचा हा मुद्दाही चांगलाच चर्चेत राहिला होता. या मुद्यावरून अनेकांनी गांगुलींवर टीका केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सागर राणा हत्या प्रकरण: ऑलम्पिक विजेता सुशील कुमारवर आरोपनिश्चिती; दिल्ली कोर्ट सुनावणार शिक्षा
दिल्ली वनडे गाजवलेल्या कुलदीपची रॅंकींगमध्येही भरारी! सिनियर्सची मात्र घसरगुंडी