हरयाणा राज्य कबड्डी असो. च्या विद्यमाने रोहतक-हरयाणा येथे आयोजित केलेल्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलांनी पॉंडेचरीला, तर मुलींनी विदर्भ संघाला चितपट करीत आगेकूच केली. महाराष्ट्राच्या मुलांनी
साखळीतील पहिल्या सामन्यात पॉंडेचरीचा ५७-२५ असा सहज पाडाव केला. आक्रमक सुरुवात करीत २६-११ अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील जोशपूर्ण खेळ करीत प्रतिस्पर्ध्यावर ४ लोण चढवीत गुणांचे अर्धशतक पार केले. महाराष्ट्राच्या तेजस पाटीलने १२ चढाया करीत ८ गुण घेतले व ५पैकी ३पकडी यशस्वी केल्या. परेश हरडने ११ चढायात ९ गुण मिळविले, तर २ पकडी यशस्वी केल्या. वैभव गर्जेने ३ पकडी घेतल्या. हर्ष लाडने २ पकडी करीत त्यांना साथ दिली. महाराष्ट्राने पकडीत १६ गुण, चढाईत ३३गुण आणि ४लोण देत ८गुण असे ५७ गुण मिळविले. पॉंडेचरीच्या अरुण कुमारने १६ चढायात १० गुण घेत बरी लढत दिली.
महाराष्ट्राच्या मुलींनी विदर्भाचा ६०-१२ असा धुव्वा उडविला. मध्यांतराला २८-०८अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील त्वेषाने खेळ करीत लीलया विजय मिळविला. मानसी रोडेने १६ चढायात १३ गुण, हरजितकौर संधूने १२ चढाया करीत ८ गुण आणि १ पकड यशस्वी केली. मृणाली टोणपे हिने ११ चढायात ८ गुण मिळविले. दिव्या गोगावले हिने ४ पैकी ३ पकडी यशस्वी करीत त्यांना छान साथ दिली.
सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या मुलांनी मध्य प्रदेशला ५४-३१असे नमवित दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि बाद फेरीचा गाठण्याचा मार्ग मोकळा केला. मध्यांतरापर्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यातील उत्तरार्धात प्रतीक चव्हाणने एका चढाईत एमपीचे ४ गडी टिपत लोण दिला आणि येथूनच सामना महाराष्ट्राच्या बाजूने एकतर्फी झुकला. आकाश चव्हाणने २४ चढाया करीत २० गुण मिळवीत सामन्यावर ठसा उमटविला. प्रथमेश निघोटने १० पैकी ६ यशस्वी पकडी केल्या, तर प्रतीक चव्हाणने चढाईत उत्तम साथ दिली. मध्य प्रदेशकडून भानू, अनुपम सिंग यांनी बऱ्यापैकी लढत दिली.
मुलींच्या दुसऱ्या सामन्यात महाराष्टाने केरळचा ४३-२४ असा पराभव करीत बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली. मध्यांतराला २४-०७अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती. मानसी रोडे, हरप्रितकौर संधू यांच्या धारदार चढाया त्याला दिव्या गोगावले, आरती म्हात्रे यांची मिळालेली पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. महाराष्ट्राच्या मुली छत्तीसगड बरोबर शेवटची साखळी लढत देतील, तर मुले झारखंड सोबत शेवटची साखळी लढत देतील.
या स्पर्धेत मुलांमध्ये ३०, तर मुलींमध्ये २९ संघांनी भाग घेतला आहे. या सहभागी झालेल्या संघाची ८ गटात विभागणी करण्यात आली असून महाराष्ट्राच्या मुलांचा क गटात समावेश आहे. या गटात महाराष्ट्रासह पॉंडेचरी, मध्य प्रदेश, झारखंड हे अन्य तीन संघ आहेत. मुलींचा ड गटात समावेश असून छत्तीसगड, विदर्भ, केरळ हे अन्य तीन संघ त्या गटात आहेत.