भारताच्या बहुप्रतीक्षित ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ३ एकदिवसीय, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या ह्या दौऱ्यात भारतीय संघाचा कस लागणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ मायदेशात कायमच दमदार कामगिरीसाठी ओळखला जातो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर धूळ चारण्यासाठी भारतीय संघाला उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे लागेल.
मागील वेळी जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, त्यावेळी कसोटी मालिकेत २-१ असा विजय मिळवून इतिहास घडवला होता. ह्यावेळी इतिहासाची पुनरावृत्ती करणे भारतीय संघासाठी कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. सद्यकालीन भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत ज्यांनी ह्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत बहारदार प्रदर्शन केले आहे. ह्या लेखात अशाच खेळाडूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
१) रवींद्र जडेजा –
रवींद्र जडेजा हा सध्याच्या भारतीय संघाचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू आहे. जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळतांना कायमच चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत नसली तरीही आपल्या अष्टपैलू खेळाने संघासाठी जडेजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने खेळलेल्या एकूण १० कसोटी सामन्यांमध्ये ३ अर्धशतकांसह ६७.५६ च्या धावगतीने ३०२ धावा काढल्या आहेत. त्याचसह गोलंदाजीतही योगदान देत १९.३३ च्या सरासरीने ५६ बळी मिळवले आहेत.
२) जसप्रीत बुमराह –
जसप्रीत बुमराह हा आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. जगभरातल्या अनेक फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीने दाती तृण धरून शरण आणले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची बुमराहची आकडेवारी कांगारूंना धडकी भरवणारी आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ४ कसोटी सामन्यांमधे १७ च्या सरासरीने २१ बळी पटकाविले आहेत आणि केवळ २.२७ ची धावगती राखली आहे. वेगवान गोलंदाजांना अनुकूल असणार्या खेळपट्ट्यांवर बुमराहची कामगिरी भारतीय संघासाठी महत्त्वाची असेल.
३) चेतेश्वर पुजारा –
चेतेश्वर पुजारा भारतीय संघाच्या कसोटी संघाचा अविभाज्य घटक आहे. भारतीय फलंदाजीच्या फळीचा आधारस्तंभ असलेला पुजारा नेहमीच संघासाठी संकटमोचकाची भूमिका निभावत असतो. ह्यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियन भूमीवर मिळवलेल्या कसोटी मालिका विजयातही पुजाराचा सिंहाचा वाटा होता. आजवर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या १६ कसोटी सामन्यांमध्ये ५ शतके आणि ७ अर्धशतकांसह ६०.०७ च्या सरासरीने १६२२ धावा काढल्या आहेत. भारतीय संघाला येत्या कसोटी मालिकेत विजय मिळवायचा असेल तर पुजाराची कामगिरी निर्णायक ठरेल.
४) रिषभ पंत –
देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील दमदार कामगिरीच्या बळावर रिषभ पंतने भारतीय संघात यष्टिरक्षकाच्या जागेवर आपली दावेदारी पक्की केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून अपेक्षेनुरूप कामगिरी त्याने केली नसली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची कामगिरी मात्र समाधानकारक आहे. ह्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चारही कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली असतांना त्याने संधीचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता. त्या दौऱ्यात पंतने ४ कसोटी सामन्यांत ३५० धावा केल्या. ह्या दौऱ्यातील त्याच्या १५९ धावांच्या खेळीचं सर्व स्तरावर कौतुक झाले. ह्या युवा खेळाडूकडून कामगिरीत सातत्य राखण्याची अपेक्षा भारतीय संघाला असेल.
५) मयंक अगरवाल –
कसोटी सामन्यांमध्ये सलामीवीराची भूमिका महत्त्वाची असते. भारतीय कसोटी संघाला गेली काही वर्षे सलामीवीराची चिंता सतावते आहे. मात्र मयांक अगरवाल त्या जागेवर स्थिरावत असल्याचे चित्र आहे. मयंकचे कांगारूविरूद्धचे आकडे भारतीय संघाचा उत्साह दुणावणारे आहेत. मयंकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ कसोटी सामन्यांमध्ये १९५ धावा काढल्या आहेत.
भारतीय संघाला जर येत्या कसोटी मालिकेत विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे राखायचा असेल, तर ह्या ५ भारतीय खेळाडूंची कामगिरी भारतीय संघासाठी महत्त्वाची असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“आमचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करण्यासाठी तयार” ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने फुंकले रणशिंग
“मी फॉर्ममध्ये आलोय !” ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे भारतीय संघाला आव्हान
“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन
ट्रेंडिंग लेख –
वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना ‘सळो की पळो’ करुन सोडणारे ३ भारतीय फलंदाज
कसोटीतील हे तीन दिग्गज कधीच दिसणार नाहीत भारताच्या निळ्या जर्सीत?
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके ठोकणारे ‘तीन’ विदेशी धुरंदर, दोन भारतीय कर्णधारांचा समावेश