भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये डिसेंबर २०२० मध्ये सुरु होणार्या कसोटी मालिकेबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भारतीय संघ जेव्हा मागच्यावेळेस ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला होता, तेव्हा भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा भारतीय संघ कसोटी मालिका जिंकेल अशी चर्चा आहे. पण भारतीय संघासमोर एक सर्वात मोठे आव्हान आहे, ते म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीतनंतर पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतणार. त्यामुळे तो भारतीय संघाचे एका कसोटी सामन्यापुरते प्रतिनिधित्व करेल.
विराट कोहली जानेवारी महिन्यात वडील होणार आहे, त्यामुळे तो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार्या केवळ पहिल्या कसोटी सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व करेल. त्यामुळे विराट कोहलीच्या अनुपस्थित चौथ्या क्रमांकावर फलंदाजी येऊन चांगली कामगिरी कोण करणार? हे सर्वात मोठे आव्हान भारतीय संघापुढे असेल.
त्यामुळे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन विराटची उणीव भरुन काढू शकतील अशा पाच खेळाडूंबद्द्ल आम्ही या लेखातून सांगणार आहोत.
५. शुभमन गिल
भारताचा २१ वर्षीय शुभमन गिल हा असा खेळाडू आहे, जो विराट कोहलीच्या गैरहजेरीत भारतीय संघासाठी संकटमोचकाची
भूमिका पार पाडू शकतो. जर शुभमन गिलच्या आकडेवारीबद्द्ल बोलायचे झाले तर, तो प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेटमध्ये २१ सामने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. ज्यामधे त्याने ७३.५५ च्या सरासरीने २१२३ धावा काढल्या आहेत. यामधे त्याच्या ७ अर्धशतकांचा आणि १० शतकांचा समावेश आहे. त्यामुळे असे म्हटले जाऊ शकते की शुभमन गिल हा पूर्णपणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास सक्षम आहे. जर त्याला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली, तर तो नक्कीच विराटची कमतरता जाणवू देणार नाही.
४. रोहित शर्मा
भारताच्या आगामी कसोटी मालिकेत जेव्हा विराट कोहली नसेल, तेव्हा रोहित शर्माकडून क्रिकेटप्रेमींना भारतीय संघाच्या फलंदाजीची जबाबदारी घेण्याची अपेक्षा असेल. परंतु सध्या रोहित शर्मा भारतात आहे, अणि तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बेंगलोरमध्ये आपल्या फिटनेसवर काम करतोय. त्याला आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे आणि टी-२० संघात स्थान मिळाले नाही.
मात्र भारतीय निवड समितीने त्याला कसोटी संघात स्थान देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी रोहित शर्माने कसोटीत मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसला होता. पंरतु मागील मालिकांपासून तो सलामीला फलंदाजी करतो. जर भारतीय संघाला विराट कोहलीची कमी भरून काढायची असेल, तर मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉ किंवा केएल राहुल सलामीला पाठवून त्यानंतर रोहितला मधल्या फळीत संधी दिली जाऊ शकते.
३. रिषभ पंत
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक रिषभ पंत याची परदेशी भूमीवर कामगिरी चांगली राहिली आहे. ही गोष्ट लक्षात ठेवून रिषभ पंतला विराटच्या जागेवर संधी मिळाली, तर रिषभ पंत हा संघासाठी संकटमोचकाची भूमिका पार पाडू शकतो. रिषभ पंतला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे होणार्या फक्त कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले.
जर पंतच्या आकडेवारीबद्दल बोलायचे, तर त्याने १३ कसोटीत सामने खेळताना २२ डावात फलंदाजी केली. यामधे त्याने २९.७६ सरासरीने ८१४ धावा केल्या आहेत. त्यापैकी १५९ धावांची नाबाद सर्वोत्तम खेळी केली. ही धावसंख्या त्याने विदेशी मैदानावर उभारली. त्याचबरोबर त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रदर्शन चांगले राहिले. आतापर्यंत त्याने ३६ प्रथम श्रेणी सामन्यात ५५५८ धावा केल्यात.
त्याचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट सुद्धा चांगला आहे. त्याने ८४.७५ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
२. हनुमा विहारी
आतापर्यंत जेव्हा – जेव्हा भारतीय संघात हनुमा विहारी स्थान मिळाले. तेव्हा – तेव्हा त्याने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. हनुमा विहारी कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत फलंदाजी कारण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे आता त्याला विराटच्या जागी संधी दिली तर तो नक्कीच या संधीचे सोने करु शकतो.
हनुमा विहारी याच्या प्रदर्शनाबद्दल बोलायचे, तर त्याने आतापर्यंत भारतीय संघासाठी ९ सामने खेळताना जबरदस्त प्रदर्शन करत ५५२ धावा काढल्यात. यामध्ये त्यानी ३६.८ च्या स्ट्राईक रेटनुसार फलंदाजी केली. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया संघासमोर खंबीरपणे उभा राहून फलंदाजी करू शकतो.
१. केएल राहुल
आयपीएलच्या दमदार कामगिरीनंतर राहुलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. बीसीसीआयने त्याची निवड करत भारतीय संघाला कठीण प्रसंगातून सावरून नेण्याची अपेक्षा त्याच्याकडून ठेवली आहे. या अगोदरसुद्धा २०१८-१९ ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारतीय कसोटी संघाचा राहुल भाग झाला होता. परंतू त्यावेळी सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडत होता. त्यामधे त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण यावेळी तो विराटच्या जागी मधल्या फळीत संधी दिली तर उत्कृष्ट भूमिका निभावू शकतो. आतपर्यंत त्याने ३६ कसोटी सामन्यात २००६ धावा काढल्या आहेत. यामध्ये ५ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता ! आपला झहीर खान होणार आमदार ?
भारतात क्रिकेटला पुन्हा सुरुवात! पहिल्याच सामन्याच मनोज तिवारी चमकला
धोनीला दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडूसाठी आयसीसीकडून नामांकन; काय आहे त्याची कामगिरी, वाचा
ट्रेंडिंग लेख –
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव वॉलाही ‘त्यादिवशी’ दादाने टॉससाठी पहायला लावली होती वाट
१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…