भारत देशात क्रिकेटला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. क्रिकेटवेड्या भारतात जर एखाद्या खेळाडूमुळे संघाने आयपीएल ट्रॉफी, टी२० अथवा वनडे विश्वचषक अश्या मोठ्या टूर्नामेंट जिंकल्या किंवा एखादा आंतरराष्ट्रीय सामना जिंकला. तर त्या खेळाडूची सर्वत्र प्रशंसा होते. पण, जर त्याच खेळाडूने एखाद्या सामन्यात खराब प्रदर्शन केले, तर भारतीय चाहते जेवढा त्याला मान देतात, त्यापेक्षा जास्त त्याचा अपमान करतात. भारतीय चाहत्यांच्या रोषापासून सचिन तेंडूलकर, युवराज सिंग, एमएस धोनी यांच्यासारखे दिग्गजदेखील वाचू शकले नाहीत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. बीसीसीआय भारतीय खेळाडूंसाठी खूप खर्च करते. त्यांना इतर देशातील खेळाडूंपेक्षा जास्त पगारदेखील देते. पण जर खेळाडू भारतीय क्रिकेट संघासाठी अपेक्षेप्रमाणे योगदान देऊ शकत नसेल, तर त्याला खूप लवकर विसरुन देखील जाते. थोडक्यात त्या खेळाडूला भारतीय क्रिकेट संघातून बाहेर करण्यात येते.
याउलट परदेशी खेळाडूंना जरी भारतीय क्रिकेटपटूंपेक्षा कमी पगार मिळत असला, तरी त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डाकडून त्यांना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये आपल्याला अनेक परदेशी खेळाडू सहभागी होताना दिसतात. पण, बीसीसीआय असे करत नाही. बीसीसीआयकडून भारतीय क्रिकेटपटूंना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. जर एखाद्या भारतीय क्रिकेटपटूला परदेशी लीगमध्ये खेळायचे असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागते.
या लेखात, अशाच ५ भारतीय खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, जे बीसीसीआयच्या दबावामुळे त्यांच्या निर्धारीत वेळेपुर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.
बीसीसीआयमुळे निश्चित वेळेपुर्वी निवृत्ती घेऊ शकणारे तीन भारतीय खेळाडू (5 Indian Players Who Retire Soon Due To BCCI) –
५. हरभजन सिंग (Harbhajan Singh) –
भारताचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंगने मार्च १९९८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण, या गोलंदाजाला एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार असतानापासूनच संधी मिळणे कमी झाले होते. भारतीय संघात त्याची जागा आर अश्विनने घेतली होती.
त्यामुळे हरभजन सिंग भारतीय संघातील त्याचे स्थान परत मिळवू शकला नाही. हरभजनला त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून जवळपास ४ वर्षे झाली आहेत. त्याने मार्च २०१६ला युनायटेड अरब इमिरेट्सविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. सध्याच्या भारतीय संघाविषयी पाहायचे झाले, तर संघात एकापेक्षा एक फिरकीपटू उपलब्ध आहेत. त्यामुळे हरभजनला कदाचितच भारतीय संघात पुनरागमन करायला मिळेल. अशात, जर हरभजनला परदेशी लीगमध्ये खेळायचे असेल, तर त्याला वेळेपुर्वी निवृत्ती घ्यावी लागेल.
४. मुरली विजय (Murali Vijay) –
भारतीय संघातून २ वर्षापासून बाहेर असलेल्या सलामीवीर फलंदाज मुरली विजयचे पुनरागमन जवळपास अशक्य आहे. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे, पण डिसेंबर २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यानंतर पुन्हा त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.
नुकताच मुरली इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसून आला होता. तिथे त्याला जास्त चांगले प्रदर्शन करता आले नाही. मुरलीची आयपीएलमधील आकडेवारी उल्लेखनीय आहे. त्याने आयपीएलमध्ये १०३ सामन्यात २ शतके ठोकत २५८७ धावा केल्या आहेत. त्याबरोबरच त्याने यावर्षी तमिळनाडू प्रीमियर लीगमध्येही शानदार प्रदर्शन केले आहे. जर, त्याला इतर परदेशी लीगमध्ये आपला जलवा दाखवायचा असेल, तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागेल.
३. मनोज तिवारी (Manoj Tiwari) –
भारतीय संघातील मधल्या फळीतील क्रिकेटपटू मनोज तिवारीला भारताकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. त्याने भारताकडून फक्त १२ वनडे सामने आणि ३ टी२० सामने खेळले आहेत. त्याने २०१५ साली झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. जरी तिवारीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रदर्शन जास्त विशेष नसले, तरी त्याची देशांतर्गत क्रिकेटमधल्या आकडेवारीवरुन त्याच्या प्रतिभेची ओळख होते.
पण, यंदा पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. एवढेच नव्हे तर, तिवारीकडून बंगाल क्रिकेट संघाचे नेतृत्त्वपददेखील हिरावून घेण्यात आले आहे. तिवारीने आयपीएलचा शेवटचा सामनादेखील २ वर्षांपुर्वी (२०१८) खेळला होता. सध्या भारतीय संघात मधल्या फळीसाठी श्रेयश अय्यर, रिषभ पंत यांसारखे विस्फोटक फलंदाज उपलब्ध आहेत. अशात आशा केली जाऊ शकते की, तिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करेल आणि परदेशी लीगमध्ये आपले नशीब आजमावेल.
२. सुरेश रैना (Suresh Raina) –
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना बऱ्याच वेळेपासून भारतीय संघातून बाहेर आहे. रैनाने २०१८ला इंग्लंडविरुद्ध त्यांचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हापासून रैना फक्त आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळताना दिसतो. रैनाचे आयपीएलमधील प्रदर्शन जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत १९३ सामने खेळत ५३६८ धावा केल्या आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामातही तो दमदार प्रदर्शन करत भारतीय संघात नव्याने एंट्री करण्यास आतुर असेल.
पण, रैनाचे भारतीय संघात पुनरागमन करणे जवळपास अशक्य वाटत आहे. रैनाने म्हटले होते की, जर बीसीसीआय भारतीय क्रिकेटपटूंना एका वर्षापेक्षा जास्त काळ संघातून बाहेर ठेवत असेल, तर त्यांना परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी द्यायला पाहिजे. नॉन-कॉन्ट्रॅक्टेड खेळाडूंना आयपीएलव्यतिरिक्त कमीत कमी २ परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मिळायला पाहिजे.
पण, बीसीसीआयचे या गोष्टीसाठी संमती देणे अशक्य आहे. त्यामुळे जर रैनाला परदेशी लीगमध्ये खेळायचे असेल. तर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागेल.
१. अंबाती रायडू (Ambati Rayudu) –
अंबाती रायडूचे नाव त्या खेळाडूंच्या यादीत येते, ज्यांचे बीसीसीआयशी मतभेद असल्यामुळे भारतीय संघातील पुनरागमनाची शक्यता शून्य आहे. रायडूनेही सुरेश रैनाप्रमाणे बीसीसीकडून परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली होती. गतवर्षीच्या विश्वचषकापुर्वीचा भारतीय संघ पाहिला तर, रायडू हा भारतीय संघातील नियमित सदस्य होता आणि त्याचा चौथ्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार समजले जात होते.
परंतु, २०१९सालच्या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघामुळे अनेक खेळाडूंना झटका बसला. रायडूच्या ठिकाणी भारतीय संघात अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकरला प्राथमिकता देण्यात आली. त्यानंतर इंग्लंडमध्ये खेळले गेलेल्या सामन्यातही शिखर धावन आणि विजय शंकरला दुखापत झाली होती. तरीही रायडूला संघात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे नाराज रायडूने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
पण, पुढे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याच्या हेतूने रायडूने निवृत्तीच्या निर्णयातून माघार घेतली. पण, आता श्रेयश अय्यरने भारतीय संघातील चौथ्या क्रमांकावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे रायडूचे पुनरागमन जवळपास अशक्य आहे. अशात बीसीसीआयच्या दबावाखाली येऊन रायडू क्रिकेटमधून लवकरच निवृत्ती घेऊ शकतो.
ट्रेंडिंग लेख –
-एक नाही तर दोन देशांकडून इंटरनॅशनल टी२० क्रिकेट खेळलेले ५ अवलिया
-आयपीएलच्या माध्यमातूनच २०२१ टी२० विश्वचषकाची जोरदार तयारी करणार हे ५ क्रिकेटर
-चालू सामन्यात गाण्याचे शब्द आठवत नव्हते म्हणून सेहवागने थेट १२व्या खेळाडूला बोलावलं होतं मैदानात