टीम इंडियानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. भारतीय संघानं श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 ने अजेय आघाडी मिळवली.
या सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. टीम इंडियाच्या या विजयानंतर नवनियुक्त कर्णधार सूर्यकुमार यादव यानं मोठं वक्तव्य केलं आहे. संघ प्रत्येक सामन्यात असंच आक्रमक क्रिकेट खेळेल, असं त्यानं म्हटलंय. सूर्यकुमार यादवच्या म्हणण्यानुसार, मालिका सुरू होण्यापूर्वीच आम्ही अतिशय आक्रमकपणे खेळू, असं ठरवलं होतं आणि आम्ही तसंच केलं.
सामन्यानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवनं टीम इंडियाच्या या जबरदस्त विजयावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, मालिकेपूर्वी आम्ही कोणत्या प्रकारचं क्रिकेट खेळू इच्छितो याबद्दल बोललो होतो. जरी लक्ष्य लहान असलं किंवा मोठं, आम्ही समान टेम्प्लेटसह फलंदाजी करू. ज्या प्रकारे वातावरण होतं, ते पाहता 160 च्या खालचा स्कोअर देखील चांगला राहिला असता. पावसामुळे आम्हाला फायदा झाला. या सामन्यानंतर आम्ही आमच्या बेंच स्ट्रेंथबाबत निर्णय घेऊ.”
पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 161 धावा केल्या होत्या. पावसामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमानुसार 8 षटकांत 78 धावांचं लक्ष्य मिळालं. टीम इंडियानं हे लक्ष्य 6.3 षटकांत फक्त 3 गडी गमावून गाठलं.
या सामन्यात भारतीय संघानं संजू सॅमसनला सलामीची संधी दिली. मात्र तो खातं न उघडता शून्यावर बाद झाला. यानंतर यशस्वी जयस्वालनं 15 चेंडूत 30 धावा, सूर्यकुमार यादवनं 12 चेंडूत 26 धावा आणि हार्दिक पांड्यानं 9 चेंडूत 22 धावा ठोकत संघाला सहज विजय मिळवून दिला.
भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 30 जुलै रोजी खेळला जाणार आहे.
हेही वाचा –
यशस्वीनं केली विराटच्या विक्रमाची बरोबरी, वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी केला हा पराक्रम
यशस्वीचा धमाका, बिश्नोईच्या फिरकीची जादू….भारतानं श्रीलंकेविरुद्धची मालिका सहज खिशात घातली
फायनल गाठूनही पाच वेळा स्वप्नभंग, अखेर 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रीलंकेने उंचावला आशिया चषक