क्रिकेट जगतात अनेक विक्रम होतात. अनेक विक्रम हे पुढे जाऊन मोडले जातात. फारच कमी विक्रम असे असतात जे मोडले जात नाहीत किंवा ज्यांची बरोबरी होती. असाच एक विक्रम म्हणजे भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने घेतलेला झेलांचा.
भारतीय संघ २०१५मध्ये श्रीलंका दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. तेव्हा गॉल कसोटीत अजिंक्य रहाणेने केलेल्या विक्रमाने त्याचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले.
या कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्त्व विराट कोहली करत होता. श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यात त्यांनी पहिल्या डावात सर्वबाद १८३ धावा केल्या. आर. अश्विनने शानदार गोलंदाजी करत ६ विकेट्स घेतल्या. याचबरोबर या पहिल्या डावात रहाणेने ३ झेल घेतले होते.
भारतीय संघाचा पहिला डाव ३७५ धावांवर संपुष्टात आल्यावर श्रीलंका संघ पुन्हा फलंदाजीला आला. तेव्हा त्यांनी दुसऱ्या डावात सर्वबाद ३६७ धावांपर्यंत मजल मारली. यात भारताकडून शानदार गोलंदाजी करताना अश्विनने पुन्हा ४ विकेट्स घेतल्या. परंतू याचबरोबर तेवढीच मोठी कामगिरी अजिंक्य रहाणेनेही केली होती. त्याने या डावात ५ झेल घेतले होते.
असे दोन्ही डाव मिळून कसोटी सामन्यात ८ झेल घेणारा जगाच्या पाठीवर ३०१३ कसोपटूंमध्ये तो पहिला क्रिकेटर ठरला होता. या विक्रमाला होऊन आता ५ वर्ष झाली परंतू आजही हा विक्रम एकट्या रहाणेच्या नावावर आहे.
कसोटी सामन्यात ६ खेळाडूंनी आजपर्यंत ७ झेल घेतले आहेत. त्यात ग्रेग चॅपेल, यजुर्वेंद्र सिंग, हसन तिलकरत्ने, स्टिफन फ्लेमिंग, केएल राहुल व मेथ्थू हेडन यांनी ७ झेल घेण्याचा कारनामा केला आहे.
रहाणेने जेव्हा कसोटी सामन्यातील ८वा झेल घेतला ती तारिख होती १५ ऑगस्ट २०१५ व त्याने ८वा झेल घेतला तो खेळाडू होता रंगना हेराथ. हा सामना पुढे श्रीलंका संघाने ६३ धावांनी जिंकला तो विषय वेगळा परंतू रहाणेचे नाव मात्र क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले.