इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकातून भारताचे दोन खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यानंतरही राखीव खेळाडू असलेल्या अंबाती रायडूला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. काही रिपोर्टनुसार या घडनेनंतर आता रायडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे.
असे असले तरी त्याच्या निवृत्तीचे नेमके कारण काय याबद्दल अजून कोणतेही वृत्त आलेले नाही. तसेच त्याने जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये पुढे खेळणार असल्याची शक्यता आहे.
मधल्या फळीतील फलंदाज रायडूने आत्तापर्यंत 55 वनडे सामन्यात खेळताना 47.05 च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने 6 टी20 सामने खेळले असून यात त्याला केवळ 42 धावा करण्याच यश आले आहे.
रायडूने याआधीच मागील वर्षी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
2019 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्याआधी चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी रायडूचे नाव चर्चेत होते. परंतू या विश्वचषकासाठी त्याच्याऐवजी विजय शंकरला संधी मिळाली. तसेच रायडूला राखीव खेळाडूंमध्ये स्थान मिळाले.
त्यांनतर विश्वचषक सुरु असताना सुरुवातीलाच शिखर धवन दुखापतग्रस्त झाला. त्यावेळी त्याच्याऐवजी रिषभ पंतला भारतीय संघात संधी मिळाली. शिखर नंतर काही दिवसांपूर्वी शंकरला पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने या विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.
त्यामुळे दोन दिवसापूर्वी बीसीसीआयने मयंक अगरवालला त्याचा बदली खेळाडू म्हणून भारतीय संघात स्थान दिले. त्यामुळे रायडूच्या विश्वचषकात खेळण्याच्या आशा आणखी धूसर झाल्या. रायडूच्या निवृत्ती मागे हे एक कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर त्याला नुकतीच आईसलँड क्रिकेट बोर्डाने कायमचे नागरिकत्व देण्याची ऑफर दिली होती. ज्यामुळे तो आईसलँडकडून क्रिकेट खेळू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकात रोहित शर्मा-केएल राहुल जोडीने रचला मोठा इतिहास
–रोहित शर्मा, विराट कोहलीने एकाच सामन्यात केला तो खास पराक्रम
–२०१९ विश्वचषकात ४ शतके करणाऱ्या रोहित शर्माचा २०११ चा ट्विट होतोय व्हायरल