श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत युवा रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघा्या नेतृत्त्वाची जबाबदारी योग्यरित्या पार पाडताना दिसत आहे. मंगळवारी (२० एप्रिल) मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्ली संघाकडून अमित मिश्राने उल्लेखनीय गोलंदाजीचे प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच त्याने सामना झाल्यानंतर मुंबईच्या अष्टपैलू खेळाडूला बाद करण्याबाबात भाष्य केले आहे.
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजांनी कंबरडे मोडले होते. अमित मिश्राने उत्कृष्ट कामगिरी करत ४ षटकात अवघ्या २४ धावा देत ४ महत्वाचे गडी बाद केले होते. यात रोहित शर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड यांचा समावेश होता. याच कामगिरीच्या जोरावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती.
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्याने हार्दिक पंड्याला बाद करण्याबाबत म्हटले की, “मी नेहमी गडी बाद करण्याचा विचार करत असतो. जेव्हाही हार्दिक खेळपट्टीवर येतो, तेव्हा तेव्हा मी त्याची विकेट काढतो. यावेळीही जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानावर आला; तेव्हा मला विश्वास होता की मी त्याला बाद करू शकतो. मी फक्त चेंडूला थोडे बाऊन्स केले आणि तो बाद झाला. हे कित्येकदा कामी येते.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “या खेळपट्टीवर चेंडू थोडा थांबून जात होता. यामुळे अशा खेळपट्टीवर चेंडू योग्य क्षेत्रात टाकने गरजेचे असते. जेव्हाही तुम्ही टी-२० मध्ये गोलंदाजी करता. तेव्हा तुम्ही फलंदाजाला बाद करण्याचा विचार करता. त्यामुळे फलंदाजांवर प्रेशर येत असते. मी माझ्या गोलंदाजीत कधीही बदल करत नाही. मी माझ्या ताकदीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो.”
तसेच पुढे तो म्हणाला, “मी गतीवर नाहीतर विविधतेवर विश्वास ठेवतो. मला माहित आहे की सपाट खेळपट्टीवर पहिल्या डावात कशा प्रकारची गोलंदाजी करायची आहे. मी आज (२० एप्रिल) गडी बाद करण्यासाठीच मैदानात उतरलो होतो. काही चेंडू चांगले पडले तर काही चेंडूवर मला गडी बाद करण्यात यश आले.”
महत्त्वाच्या बातम्या-
मिश्राजींपुढे मुंबईचे लोटांगण, भल्याभल्या फलंदाजांच्या ‘अशा’ चटकावतो विकेट्स; स्वत:च केला उलगडा