जगभरातील प्रसिद्ध टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा रणसंग्राम अखेरच्या टप्प्याकडे जात आहे. हा हंगाम संपण्यासाठी जेमतेम ३ आठवड्यांचा कालावधी दिवस शिल्लक आहे. आयपीएलच्या या हंगामानंतर पुन्हा एकदा सर्व संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसतील. यामध्ये भारतीय संघाला आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळायचे आहे.
आयपीएलनंतर लगेच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी करणार दोन हात
भारतीय क्रिकेट संघाला आपल्याच देशात ९ जून ते १९ जून दरम्यान ५ सामन्यांच्या टी२० मालिकेचे यजमानपद सांभाळायचे आहे. ही मालिका भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात पार पडणार आहे. या मालिकेपूर्वीच भारतीय संघाच्या गोटात संघ निवडीवरून चर्चा सुरू झाल्याचे दिसत आहे.
या टी२० मालिकेत सर्वाधिक नजर ही विराट कोहली (Virat Kohli) याच्या निवडीवर असेल. कारण, विराटला या मालिकेत संधी मिळेल का? तसेच, निवडकर्ते विराटला विश्रांती देण्याबाबत विचार करतील का? हे पाहावे लागेल.
विराटला संधी मिळणार का ब्रेक?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली या आयपीएल हंगामात खूपच खराब फॉर्ममधून जात आहे. विराट अपेक्षित कामगिरी करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या ११ डावात फक्त २१६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला फक्त एका सामन्यात अर्धशतक झळकावण्यात यश आले आहे.
सर्वात निराशाजनक बाब म्हणजे, विराट या हंगामात एकदा-दोनदा नाही, तर तब्बल ३ वेळा गोल्डन डक (शून्य धावेवर बाद) झाला आहे. यानंतर निवडकर्त्येही चिंतेत पडले आहेत की, विराटला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विश्रांती द्यायची की संधी?
संघ निवडण्यापूर्वी निवडकर्ते साधणार विराटशी संवाद
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांदरम्यान होण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे की, चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती विराटशी चर्चा करेल. जिथे त्याला विचारले जाईल की, या खराब काळात त्याला ब्रेक हवा आहे की, नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
निवडकर्त्यांच्या हवाल्याने माध्यमांनी सांगितले की, “हा एक टप्पा आहे ज्यातून प्रत्येक खेळाडू जातो आणि विराटही याच टप्प्यातून जात आहे. यावर तो नक्कीच मात करेल. मात्र, निवडकर्ता म्हणून आम्हाला आधी संघाचा विचार करावा लागेल. त्याला क्रिकेटमधून ब्रेक हवा आहे की, हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी लढा सुरू ठेवायचा आहे, याबाबत आम्ही त्याच्याशी चर्चा करू.”
विराट कोहलीची आयपीएल कारकीर्द
विराट जरी या हंगामात खराब कामगिरी करत असला, तरीही त्याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने २१९ सामन्यात फलंदाजी करताना ३६.३१च्या सरासरीने ६४९९ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ४३ अर्धशतकेही झळकावली आहेत.