आयपीएल २०२१ च्या आधी खेळाडूंचा मेगा लिलाव होईल. मेगा लिलावापूर्वी सर्व फ्रँचायझी आणि क्रिकेट चाहत्यांच्या मनात एक प्रश्न आहे की एखादा संघ किती खेळाडू कायम ठेवू शकतो. खरंतर, पुढील वर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघ येणार आहेत. यानंतर संघांची संख्या १० होईल. आता विद्यमान आठ संघ कायम ठेवू शकणाऱ्या खेळाडूंची संख्या व लिलावापूर्वी दोन नवीन संघांना निवडण्याची परवानगी असलेल्या खेळाडूंची संख्या याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
एका प्रसिद्ध क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, आगामी आयपीएलसाठी संघांना चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यामध्ये तीन भारतीय खेळाडू आणि एक परदेशी खेळाडू असतील. असे झाल्यास मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ससारख्या संघांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना नेहमीच त्यांचे प्रमुख खेळाडू सोबत हवे असतात. दिल्लीचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा यांनी आधीच सांगितले आहे की त्यांना कोअर टीम कायम ठेवण्यास आवडेल.
अशी असू शकते प्रक्रिया
दोन नवीन संघांच्या समावेशामुळे, विद्यमान संघांना लिलावात राईट टू मॅच (आरटीएम) कार्ड मिळण्याची शक्यता नाही. अशा प्रकारे, फ्रँचायझीला त्यांच्या राखीव खेळाडूंवर अवलंबून राहावे लागेल. असे झाल्यास राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स या संघांना आपले संघ आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल. सहभागी होणाऱ्या दोन नवीन संघांना लिलावापूर्वी दोन किंवा तीन खेळाडू निवडण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. उत्कृष्ट भारतीय खेळाडू न मिळाल्यास ते विदेशी खेळाडू देखील निवडू शकतात.
लिलावासाठी मिळू शकते इतकी रक्कम
आगामी आयपीएल लिलावासाठी प्रत्येक संघाला ९० ते १०० कोटी रुपये खर्च करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, एखाद्या संघाने आपले चारही खेळाडू कायम केल्यास त्यांना ४०-४५ कोटी रुपयांचा तोटा होऊ शकतो. एमएस धोनी, रोहित शर्मा, रिषभ पंत व विराट कोहली यांसारख्या बड्या खेळाडूंना कायम राखण्याचा संघ प्रयत्न करतील.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाक महामुकाबल्यात कोणाचे पारडे जड? कशी असेल खेळपट्टी? वाचा सविस्तर