Harmanpreet Kaur Statement: भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गुरुवारचा (दि. 28 डिसेंबर) दिवस निराशाजनक ठरला. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडलेल्या भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील पहिला वनडे सामना एलिसा हिली हिच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने जिंकला. यासह पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. दुसरीकडे मात्र पराभवामुळे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर निराश झाली. तिने मोठे विधान केले.
काय म्हणाली हरमनप्रीत?
भारतीय संघाच्या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने आपल्या संघाच्या क्षेत्ररक्षणावर राग काढला. तिने सामन्यानंतर स्पष्टपणे म्हटले की, ‘आमच्या संघाचे क्षेत्ररक्षण खूपच खराब राहिले आणि मी यामुळे नाखुश आहे.’ हरमन म्हणाली, “मला वाटते की, आम्ही चांगली धावसंख्या उभारली होती, पण चांगले क्षेत्ररक्षण करू शकलो नाही. काही काळानंतर दवही पडले होते. मात्र, गोलंदाजांनी स्टम्प्सवर गोलंदाजी करत सामन्यातील आव्हान जिवंत ठेवले, पण मला वाटते की, क्षेत्ररक्षण ही अशी गोष्ट होती, ज्याने आज मोठी भूमिका बजावली.”
पुढे बोलताना हरमनने पूजा वस्त्राकर हिचे कौतुक केले. ती म्हणाली, “पूजाने तिच्या फलंदाजीने आम्हाला संघात परत आणले. आम्हाला योग्य गोष्टी करत राहण्याची गरज आहे. आपल्याला स्वत:ला पाठीशी घालून आक्रमक खेळ खेळण्याची गरज आही.”
खरं तर, भारतीय महिला क्रिकेट संघाने वनडे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारली होती. तसेच, ऑस्ट्रेलियाने वनडे इतिहासातील दुसरे सर्वात मोठे आव्हान यशस्वीरीत्या मिळवले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 282 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया महिला संघाने 46.3 षटकात 4 विकेट्स गमावत 285 धावा करत सामना सहजरीत्या खिशात घातला. मालिकेतील दुसरा सामना 30 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करत मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल. (captain harmanpreet kaur unhappy with india s fielding after defeat in 1st odi against australia)
हेही वाचा-
दोन्ही डावात मिळून 5 धावा करणाऱ्या कॅप्टन रोहितचे पराभवानंतर लक्षवेधी भाष्य; म्हणाला, ‘विरोधी संघाची ताकद…’
Boxing Day Test । दिग्गजांनी भरलेल्या टीम इंडियावर मान खाली घालण्याची वेळ! डाव आणि 32 धावांनी तिसऱ्याच दिवशी गमावला सामना