रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ६८ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. वनडेतील तिन्ही सामने गमावल्यानंतर वेस्ट इंडिज संघाकडून टी२० मध्ये चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र वेस्ट इंडिज संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. रोहितने स्वतः आघाडीवर राहत ६४ धावा केल्या. सध्याचा फॉर्म पाहता दुसरा टी२० सामनाही भारताच जिंकण्याची शक्यता जास्त आहे. तसे झाल्यास कर्णधार रोहित शर्मा सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत वेस्ट इंडिजचा माजी टी२० विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीच्या पुढे जाईल.
वेस्ट इंडीजने २०१२ व २०१४ टी२० विश्वचषक जिंकले होते. या दोन्ही संघांचा कर्णधार डॅरेन सॅमी होता. वेस्ट इंडिजच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सॅमीने ४७ टी२० सामन्यांत २७ विजय मिळवून कर्णधारपदाची कारकीर्द संपवली होती. भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वात ३२ टी२० सामने खेळला आहे. या ३२ सामन्यांमध्ये भारताने २७ विजय मिळवले आहेत. आणखी एका विजयासह तो सॅमीला मागे टाकेल.
रोहितची भारताचा टी२० कर्णधार म्हणून जबरदस्त आकडेवारी आहे. त्याच्या नेतृत्वात भारताच्या विजयाची टक्केवारी ८४.३७ आहे. तो या वर्षाच्या अखेरीस प्रथमच आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषकात भारताचा कर्णधार असणार आहे. २०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर रोहितने भारताचा पूर्णवेळ टी२० कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. आता तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करतो. नियमित कर्णधार झाल्यानंतर रोहितने ५० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. या ५० सामन्यांमध्ये कर्णधार असताना रोहित शर्माने ४२ सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्याच नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शाहरूख खानने अवघ्या चार चेंडूत विरोधी संघाच्या अंतिम फेरीच्या आशेवर फेरले पाणी
‘कोहलीमुळेच भारत टी२० विश्वचषक जिंकू शकत नाही’, पाकिस्तानी दिग्गजाने सोडले टीकास्त्र