भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. येत्या काही दिवसांत भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघामध्ये मर्यादित षटकांची मालिका रंगणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात सलामी फलंदाज म्हणून पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. पृथ्वी शॉच्या छोट्याश्या कारकिर्दीत अनेकदा उतार चढाव आले आहेत. त्याला अनेकदा मोठ्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. परंतु त्या संधीचे सोने करण्यात तो अपयशी ठरला आहे, ज्यामुळे त्याला संघातून आपले स्थान गमवावे लागले आहे.
इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्याने ८ सामन्यात ३०८ धावा केल्या होत्या. याच खेळीच्या जोरावर त्याला श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाच्या माजी प्रशिक्षकांनी पृथ्वी शॉबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ सोबत बोलताना, माजी भारतीय प्रशिक्षक अंशुंमन गायकवाड यांनी म्हटले की, “ही मालिका पृथ्वी शॉसाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. पृथ्वी शॉ एक उत्कृष्ट खेळाडू आहे. त्याने खूप धावा केल्या आहेत. जेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते,ते व्हा वाटले होते की तो इथे टिकून राहील. परंतु असे झाले नाही. हे कदाचित अती विश्वास किंवा बढाई मारल्यामुळे झाले असावे. खेळाडूने जमिनीशी जोडून राहणे खूप गरजेचे असते.”
“मला माहित आहे खेळाडू युवा अवस्थेत असताना असे होते. परंतु मला असे वाटते की, त्याला अद्दल घडली आहे. काही खेळाडू दुसऱ्यांना पाहून प्रेरित होत असतात, तर काही खेळाडू आपल्या अनुभवातून शिकत असतात,” असेही ते म्हणाले. (Former Indian coach anshuman Gaikwad says it is important for Prithvi shaw to remain grounded)
जेव्हा पृथ्वी शॉने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले होते की, “तो सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि वीरेंद्र सेहवाग यांचे मिश्रण आहे.” परंतु त्यानंतर त्याच्या कामगिरीमध्ये अनेक उतार चढाव आले आहेत.
२०१९ मध्ये पृथ्वी शॉ डोप चाचणीमध्ये फेल झाला होता, ज्यामुळे त्याच्यावर ८ महिन्यांचा निर्बंध लावण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. याच दरम्यान त्याचा फॉर्म देखील गेला होता. २०२० मध्ये त्याला न्यूझीलंड दौऱ्यावर संधी देण्यात आली होती. परंतु तो या मालिकेत फ्लॉप ठरला होता. तसेच २०२० आयपीएल स्पर्धेत देखील त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.
२०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर देखील त्याला संधी देण्यात आली होती. परंतु या संधीचे सोने करण्यास तो अपयशी ठरला होता. ज्यामुळे त्याला संघाबाहेर काढण्यात आले होते. परंतु त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवले आहे. श्रीलंका दौऱ्यावर तो कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘त्यावेळी मी झहीरला शिव्या दिल्या की मला सलामीवीर बनवलं, पण आज…’, सेहवागने केला खुलासा
इंग्लंड-भारत मालिकेच्या पहिल्या सामन्यातून आणखी एक क्रिकेटपटू बाहेर