भारतीय संघाचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही सामन्यांपासून भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. यापूर्वी रिषभ पंतच्या खेळण्यावर टीका केली जात होती. परंतु ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करून त्याने टीका करणाऱ्यांचे तोंड बंद केले आहे. आता त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. येणाऱ्या आयपीएल हंगामात दिल्ली संघाचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतचे माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने देखील कौतुक केले आहे. यासोबतच त्याने मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
रिषभ पंत आगामी आयपीएल हंगामात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत दिल्ली संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. अशातच माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने त्याला, धोनीसारखं बनायचा प्रयत्न करू नको असा सल्ला दिला आहे.
तो म्हणाला, “पंत गेल्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. परंतु या हंगामात त्याने भारतीय संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. तसेच त्याचा आत्मविश्वास देखील वाढला आहे. जेव्हा तुम्ही टी-२० सामने खेळत असता, तेव्हा तुम्हाला आणखी काय हवं असतं. मुख्यतः रिषभ पंत सारख्या खेळाडूंना, त्यांच्या मनात कुठलीही शंका नसते.”
तसेच तो पुढे म्हणाला, “एमएस धोनीसोबत तुलना होत असताना त्याच्यावर दबाव येत होता. त्यामुळे त्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु तो स्वतः एक चांगला खेळाडू आहे. त्याला धोनीसारखा बनायची आवश्यकता नाही. तो धोनीपेक्षाही चांगला खेळाडू बनू शकतो. तो नेहमीच स्वतःच्या हिमतीवर सामना जिंकवु शकतो. म्हणून मला असे वाटते की रिषभ पंत दिल्ली संघासाठी प्रमुख खेळाडू ठरू शकतो.”
रिषभ पंतकडे दिल्ली संघाचे सूत्र
इंग्लंड दौऱ्यावर गंभीर दुखापत झाल्यानंतर श्रेयस अय्यरला मैदानाबाहेर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दिल्ली संघासमोर सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला होता की, श्रेयसचा अनुपस्थितीत दिल्ली संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी कोण पार पाडणार?
या पदासाठी दिल्ली संघात अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ आणि आर अश्विन सारखे दिग्गज खेळाडू असताना देखील, दिल्ली संघाने रिषभ पंतवर विश्वास दाखवत त्याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की, तो ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतो?
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषकात आजपर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केलेले ७ कर्णधार व त्यांची कामगिरी
पाकिस्तान क्रिकेट संघ विश्वचषकासाठी भारतात येऊ शकतो का? पाहा काय म्हणतेय बीसीसीआय
पाच महान भारतीय क्रिकेटर, ज्यांना विश्वचषकाचा एकही सामना खेळण्याची मिळाली नाही संधी