‘रावळपिंडी एक्सप्रेस’ या नावाने ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज म्हणजे शोएब अख्तर होय. भारतीय संघाने सामना जिंकलाय आणि अख्तरने त्यावर प्रतिक्रिया दिली नाही, असे कधीच झाले नाही. गुरुवारी (दि. 02 नोव्हेंबर) भारतीय संघाने विश्वचषकाच्या 33व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 302 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीत एन्ट्री केली. अशात याविषयी अख्तरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला अख्तर?
शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने म्हटले आहे की, भारतीय संघ (Team India) सध्या इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे की, त्यांना रोखणे खूपच कठीण आहे. अख्तरने भारतीय (Team India) गोलंदाजांची प्रशंसा केली आहे. त्याच्या युट्यूब चॅनेलवर बोलताना अख्तरने भारतीय संघासाठी कौतुकाचे पूल बांधले.
तो म्हणाला, “भारतीय संघ खूपच जबरदस्त बनला आहे. आता त्यांना रोखणे अशक्य झाले आहे. माझी इच्छा आहे की, भारताने आपल्या गोलंदाजांसाठी जल्लोष करावा. आज प्रत्येक चेंडूवर काही ना काही घडत होते आणि खूपच उत्सुकता होती. मोहम्मद शमी याच्यासाठी मी खूपच खुश आहे. त्याची लय परतली आहे. 3 सामन्यात त्याने 14 विकेट्स घेतल्या. सिराजही शानदार प्रदर्शन करत आहे. बुमराह खूपच जबरदस्त लयीत आहे. त्याने इतर गोलंदाजांना मोकळेपणाने गोलंदाजी करण्याची परवानगी दिली आहे. बुमराहचे कौशल्य खूपच चांगले आहे. मला आशा आहे की, हे गोलंदाज अखेरपर्यंत फिट राहतील.”
Time for India to start celebrating their Fast bowlers. #INDvsSL pic.twitter.com/dQklgFNUpL
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 2, 2023
सामन्यात काय घडलं?
भारतीय संघाने वानखेडे स्टेडिअममध्ये खेळलेल्या या सामन्यात श्रीलंकेला 302 धावांनी पराभवाची धूळ चारली. प्रथम फलंदाजी करताना भारताने या सामन्यात निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 357 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या नाकी नऊ आल्या. त्यांचा संपूर्ण डाव 19.4 षटकात अवघ्या 55 धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाकडून मोहम्मद शमी याने शानदार गोलंदाजी केली. त्याने 5 षटकात 1 निर्धाव षटकासह 18 धावा खर्चून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
शमीव्यतिरिक्त मोहम्मद सिराज यानेही 16 धावा खर्चून 3 विकेट्स घेतल्या. तसेच, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. त्यामुळे श्रीलंका संघ 55 धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह भारतीय संघ आता उपांत्य फेरीत पोहोचला आहे. तसेच, उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत हा पहिला संघ बनला आहे. (former pacer shoaib akhtar statement team india performance in world cup 2023)
हेही वाचा-
‘मी पूर्णपणे फिट नाही, डेंग्यूमुळे माझे…’, शतक हुकल्यानंतर शुबमनचा धक्कादायक खुलासा
इकडं राहुलची विकेट पडली अन् तिकडं पत्नी अथियाने तोंड लपवलं; रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद, तुम्ही पाहिला का?