भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. अश्विनने ८२ चेंडूत ६१ धावा केल्या. तर, जडेजा नाबाद राहिला आणि त्याने २२८ चेंडूत १७५ धावा केल्या. त्यानंतर अश्विनने श्रीलंकेच्या दोन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेला बाद केले.
दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेच्या संघाने ४ विकेट गमावून १०८ धावा केल्या. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर म्हणाला की, या कामगिरीने हे सिद्ध झाले की हे दोन स्टार अष्टपैलू खेळाडू परदेशातही एकत्र खेळण्यास योग्य आहेत.
“मला घराबाहेर या दोघांना एकत्र खेळताना पाहायचे आहे, मग ते दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा इंग्लंड असो. दोन फिरकीपटू एकत्र खेळू शकत नाहीत, असे आपण अनेकदा म्हणतो. मात्र, जर तुमच्याकडे असे दोन चांगले फिरकीपटू असतील आणि जडेजा तुम्हाला ७ व्या क्रमांकावर इतकी चांगली फलंदाजी देऊ शकत असेल तर त्यात काही हरकत नाही.”
तो पुढे बोलताना म्हणाला, “कसोटी सामना जिंकण्यासाठी तुम्हाला २० विकेट्स घेणे आवश्यक आहे. कसोटी क्रिकेट हा फक्त पहिल्या डावाचा खेळ नाही. तुम्ही कुठेही गेलात तरी तिसर्या किंवा चौथ्या डावात चेंडू वळू लागतो,”
गंभीर पुढे म्हणाला, “अश्विन आणि जडेजा हे दोघेही गोलंदाज आहेत जे फलंदाजीही करू शकतात. ते तुम्हाला एक विलक्षण आक्रमण देऊ शकतात. तुम्ही खेळावर नियंत्रण ठेवू शकता आणि तुमच्या वेगवान गोलंदाजांना ब्रेकही देऊ शकता. तसेच, जडेजा आणि अश्विन हे खेळपट्टीची थोडीशी मदत घेऊनही घातक संयोजन ठरू शकतात.”
जडेजाने या डावात (२२८ चेंडूत नाबाद १७५) आपले दुसरे कसोटी शतक पूर्ण केले. भारताने आपला पहिला डाव ८ बाद ५७४ धावांवर घोषित केला. जडेजाने आपल्या डावात १७ चौकार आणि तीन षटकार मारून श्रीलंकेच्या आक्रमणाला खिळवून ठेवले.
महत्वाच्या बातम्या-
रोहित-विराट यांच्यात आहे का वाद? हा व्हिडिओ पाहून मिळेल उत्तर (mahasports.in)