भारतीय महिला संघाला 2017 विश्वचषकातच्या अंतिम सामन्यात पोहचवण्यात मोलाचा वाटा उचलणारे प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी अचानक मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
आरोठे यांनी महिला क्रिकेटपटू सरावाच्या वेळी आणखी कष्ट घेण्याची तयारी दाखवत नसल्याचे कारण सांगुन त्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच काही खेळाडूंनी बीसीसीआयला प्रशिक्षक बदलण्याची विनंतीही केली होती.
याबद्दल टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना आरोठे म्हणाले, “या मुलींनी सांगितल्याप्रमाणेच तुम्ही सरावाची पद्धतीला परवानगी देऊ शकत नाही. जर या मुलींना काही मिळवायचे असेल तर त्यांना त्यांच्या कंफर्ट झोनमधून बाहेर येणे गरजेचे आहे. पण त्यांना ते नको आहे. बीसीसीआयनेही खेळाडूंकडून आलेल्या अशा विनंतीला थारा नाही द्यायला पाहिजे.”
आरोठे पुढे म्हणाले, ” या मुलींना आडीच तासांच्या सरावासाठी ड्रेसिंग रुममधून बाहेर यायची इच्छा नसते. असे असेल तर त्यांना चार तासांच्या सरावासाठी कसे तयार करणार. मी विश्वचषकावेळी आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी अशाच प्रकारचा कॅम्प घेतला होता. त्यावेळी कोणी तक्रार करण्यास आले नाही. अपयश लपवण्यासाठी मुलींनी दिलेले हे एक फक्त कारण आहे.
मागील वर्षी एप्रिल महिन्यात आरोठे यांनी भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद स्विकारले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वचषक 2017 मध्ये संघाला उपविजेतेपद मिळाले होते. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही भारतीय संघाला यश मिळाले होते.
मात्र त्यानंतर इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झालेल्या तिरंगी टी20 मालिकेत आणि आशिया चषकात भारताचा सपशेल पराभव झाला. यादरम्यान आरोठे आणि खेळाडूंमधील वाद वाढला.
तसेच जून महिन्यात महिला खेळाडूंचा कॅम्प रद्द झाल्याने बेंगलोरमधे पार पडलेल्या बीसीसीआय अॅवॉर्ड्सच्या कार्यक्रमानंतर या खेळाडू थेट घरी गेल्या. त्यामुळे प्रशिक्षक आणि खेळाडूंमधील वाद सर्वांसमोर आला.
याआधीही मागील वर्षी भारताच्या पुरुष संघाबाबतीत असाच प्रकार घडला होता. त्यावेळी अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
-भुवनेश्वर कुमारला वनडे कारकिर्दीत मैलाचा दगड पार करण्याची संधी
-भारत-इंग्लंड मालिका सुरु होण्यापुर्वी ह्या ५ खास गोष्टी नक्की माहीत करुन घ्या