आयपीएल स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर यूएई आणि ओमान मध्ये टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय संघात मोठा बदल केला आहे. ज्यामध्ये शार्दुल ठाकूरला मुख्य संघात सहभागी करून अक्षर पटेलला राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर अनेकांना हा प्रश्न पडला आहे की,हा पंड्या या स्पर्धेत गोलंदाजी करणार का ? आता याबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे.
गोलंदाजी नाही करणार हार्दिक
हार्दिक पंड्याची गोलंदाजी आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी चिंतेचे कारण ठरत होती. तो या स्पर्धेत गोलंदाजी करेल का? की त्याला फलंदाज म्हणून संघात स्थान दिले जाईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. आता बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे की, हार्दिक पंड्या आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत गोलंदाजी करताना दिसून येणार नाही.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, “तो (हार्दिक पंड्या) गोलंदाजी करू शकणार नाही. तो विश्वचषक स्पर्धेत फलंदाज म्हणून खेळताना दिसेल. विश्वचषक स्पर्धा सुरू असताना तो पूर्णपणे फिट होऊ शकतो आणि गोलंदाजी करू शकतो. परंतु आता सध्या तो गोलंदाजी करू शकणार नाही. आम्ही अक्षर पटेलसाठी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु संघ संतुलित करण्यासाठी आम्हाला शार्दुल ठाकूरला संघात स्थान द्यावे लागले.
अचानकपणे शार्दुलला दिले संघात स्थान
बुधवारी (१३ ऑक्टोबर) निवडकर्त्यांनी एक आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात अक्षर पटेलला मुख्य संघात स्थान देण्यात आले होते. तर शार्दुल ठाकूरला राखीव खेळाडू म्हणून स्थान दिले गेले होते. परंतु हार्दिक पंड्या गोलंदाजी करत नसल्यामुळे निवडकर्त्यांनी शार्दुल ठाकूरला संघात स्थान देऊन, अक्षर पटेलला राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेतला होता.
हार्दिक पंड्या फलंदाजीला येऊन कुठल्याही परिस्थितीत सामना बदलू शकतो. त्यामुळे तो गोलंदाजी करत नसला तरी फलंदाज म्हणून मोलाची भूमिका पार पाडू शकतो. त्यामुळेच शार्दुल ठाकूरला चौथा वेगवान गोलंदाज म्हणून या संघात स्थान दिले गेले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे तीन गोलंदाज आहेत. तर, शार्दुल ठाकूरने देखील गेल्या काही महिन्यात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघासाठी एकूण १८ गडी बाद केले आहेत. परंतु शार्दुलला संघात देण्याचे मुख्य कारण काय? याबाबत बीसीसीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिली नाहीये.
आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव,रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल