ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज नॅथन लायन यावर्षी त्याची सहावी ऍशेस मालिका खेळणार आहे. सध्या तो या मालिकेसाठी तयारी करतोय. लायनने यापूर्वी भारतीय संघाविरुद्ध काही कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, तो विजयी संघाचा एकदाही भाग होऊ शकला नाही. अशात त्याने भारताविरुद्ध विजयाची इच्छा व्यक्त केली आहे. लायन भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकू इच्छितो आणि त्यामध्ये त्याला महत्वाची भूमिका पार पाडायची आहे.
ऑस्ट्रेलियाने भारतासोबत भारतात खेळलेल्या २०१३ आणि २०१७ मधील कसोटी मालिकेत लायनने त्याच्या संघाचे प्रतिनिधितत्व केले होते. २०१३ च्या तुलनेत २०१७ मध्ये त्याचे प्रदर्शन उत्कृष्ट होते. त्याने यावेळी चार कसोटी सामन्यांमध्ये १९ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतील त्याने भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे आपले प्रमुख लक्ष्य असल्याचे सांगितले आहे.
या मुलाखतीत बोलताना त्याने महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तो यावेळी म्हणाला की, “एक मोठे लक्ष्य हे आहे की, मला त्या ऑस्ट्रेलियन संघाचा भाग बनायचे आहे, जो भारतात कसोटी मालिका जिंकेल. मला त्यात महत्वाची भूमिका पार पाडायची आहे. हे नक्कीच माझ्या प्रमुख लक्ष्यांपैकी एक आहे. मला असे वाटते की, हे संघाच्या दृष्टीनेही मोठे आव्हान आहे.”
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ २००४ नंतर एकदाही भारतामध्ये कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. स्टीव स्मिथ कर्णधार असताना २०१६-१७ मध्ये एकदा ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या जवळ आला होता, पण विजय मिळवू शकला नव्हता. याच पार्श्वभूमीवर लायनच्याही मनात भारतविरुद्ध कसोटी जिंकण्याची इच्छा अपूर्ण राहिलेली दिसते.
काही काळापूर्वी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत मात दिली होती. याबाबत बोलताना लायनने त्यावेळी ऑस्ट्रेलियाने केलेल्या चुका मान्य केल्या आहेत. त्याच्या मते त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघ त्यांच्या बेसिक्सवर टिकू शकला नव्हता. त्याच्या मते पुढे जाण्यासाठी शिस्तप्रिय होण्याची गरज आहे.