जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला बुधवारी (7 जून) सुरुवात झाली. लंडन येथील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ या सामन्यात भिडत आहेत. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्नशील आहेत. त्याचवेळी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील एक मैलाचा दगड पार केला.
ओव्हलच्या मैदानावर नाणेफेकीसाठी येताच रोहितने आपला पन्नासावा कसोटी सामना पूर्ण केला. सध्या 36 वर्षांच्या असलेल्या रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात 2013 मध्ये केली होती. ही मालिका सचिन तेंडुलकर याची अखेरची मालिका ठरलेली. कारकिर्दीतील मोठा भाग पाचव्या व सहाव्या क्रमांकावर खेळल्यानंतर त्याला सलामी वीर म्हणून बढती देण्यात आली. तत्पूर्वी, 2018 मध्ये त्याला संघातील आपली जागा देखील गमवावी लागली होती. 2019 मध्ये सलामीवीराच्या रुपात पुनरागमन केल्यानंतर त्याने आपली छाप पाडली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया व इंग्लंडमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली. 2022 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व त्याच्याकडे देण्यात आले. त्यानंतर आता त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटी क्रिकेटचा सर्वात मोठा सामना खेळताना दिसतोय.
भारताकडून आजपर्यंत 36 खेळाडूंना 50 किंवा अधिक कसोटी सामन्यांचा टप्पा पार केला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सर्वाधिक 200 कसोटी खेळल्या आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (109), चेतेश्वर पुजारा (103), अजिंक्य रहाणे (83), रविंद्र जडेजा (65), मोहम्मद शमी (64) व उमेश यादव (57) यांनी 50 पेक्षा अधिक कसोटी खेळल्या आहेत.
(Indian Captain Rohit Sharma Complete 50 Test Becomes 36 Th Indian)