---Advertisement---

“अहमदाबादच्या खेळपट्टीवर जो रूट ५ बळी घेत असेल तर अश्विन-अक्षर यांचे कौतुक कशाला?”

---Advertisement---

सध्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या संघात चार कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात असून यातील तिसऱ्या सामन्यावरून मात्र क्रिकेट विश्वात घमासान चर्चा होताना दिसत आहे. अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला. भारताने या सामन्यात १० गडी राखून विजय मिळवला.

मात्र दोनच दिवसात निकाल लागल्याने आता या सामन्यातील खेळपट्टीवरुन वादंग निर्माण झाला आहे. काही खेळाडूंनी खेळपट्टीचा दोष नसून फलंदाजांकडे तंत्राचा अभाव असल्याने सामना लवकर संपला असे मत मांडले. तर काहींनी खेळपट्टी अतिशय निकृष्ट दर्जाची होती असे मत मांडले. या चर्चेत आता पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम उल हकने देखील उडी घेतली आहे. त्याने या खेळपट्टीवर सडकून टीका केली आहे.

“कसोटी क्रिकेटसाठी अशी खेळपट्टी घातक”

अहमदाबादच्या खेळपट्टीबाबत बोलताना इंझमाम उल हक म्हणाला, “कोणीच विचार केला नसेल किंवा कोणालाच वाटलं नसेल की कसोटी सामना दोन दिवसात संपेल. अशा प्रकारची खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी अजिबात योग्य नाही. भारतीय संघ चांगला खेळला की खेळपट्टी वाईट दर्जाची होती? माझ्यामते नक्कीच खेळपट्टीचा दर्जा योग्य नव्हता. आयसीसीने यावर कारवाई करायला हवी. अन्यथा अशा प्रकारच्या खेळपट्ट्या अजून तयार केल्या जातील.”

आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलतांना इंझमामने ही मते मांडली. जो रूटने पाच बळी घेतल्याबद्दलही त्याने आश्चर्य व्यक्त केले. तो म्हणाला, “जर जो रूट ६ षटकांमध्ये ५ बळी घेत असेल तर खेळपट्टी कशी असेल याची तुम्हीच कल्पना करा. जर असेच असेल तर मी अक्षर पटेल आणि आर अश्विनचे कौतुक कसे करणार? कसोटी क्रिकेटचे एक वेगळे महत्व आहे आणि ते जपले पाहिजे. अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांनी त्याचा दर्जा खालावत आहे.”
दरम्यान, तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टीवरचे रामायण अजून चालूच असले तरी दोन्ही संघ मात्र चौथ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सामना उद्यापासून म्हणजेच ४ मार्चपासून अहमदाबादच्याच ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ वर खेळवला जाईल.
महत्वाच्या बातम्या:

क्रिकेटपासून जरा लक्ष दुसरीकडे वळवा, तरच, कर्णधार जो रूटचा संघ सहकार्‍यांना सल्ला

या शहरात आयोजित व्हावे आयपीएलचे सामने, थेट मुख्यमंत्र्यांचीच बीसीसीआयला विनंती

इंस्टाग्रामवर १०० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याने भारावला कोहली, अनोख्या अंदाजात मानले चाहत्यांचे आभार

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---