ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या ऍडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ८ गडी राखून पराभव करत, मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारताचा दुसरा डाव ३६ धावांवर गुंडाळत, भारताने दिलेले ९० धावांचे लक्ष दोन गड्यांच्या मोबदल्यात गाठून ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सामना आपल्या संघाच्या पारड्यात टाकला. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार विराट कोहली अत्यंत निराश दिसला. सामन्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया देताना, हा पराभव अवर्णनीय आहे असे म्हटले.
भारताचा झाला अडीच दिवसात पराभव
ऍडलेड येथे संपलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने भारताला अवघ्या अडीच दिवसात पाणी पाजले. भारताच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स व जोस हेजलवूड यांनी भारताचा डाव अवघ्या ३६ धावांवर गुंडाळला. विजयासाठी मिळालेले ९० धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने सलामीवीर ज्यो बर्न्सच्या अर्धशतकामुळे दोन गडी गमावत पूर्ण केले.
पराभवानंतर विराट कोहली दिसला निराश
या पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली अत्यंत निराश दिसला. सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात विराट म्हणाला, “हा पराभव मी शब्दात सांगू शकत नाही. तिसरा दिवस सुरू होण्याआधी आमच्याकडे ६० धावांची आघाडी होती. परंतु, पहिल्या सत्रात आमची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. पहिले दोन दिवस आम्ही सामन्यावर वर्चस्व गाजवले. मात्र, तिसऱ्या दिवशी एका तासात सर्वकाही उध्वस्त झाले. ही अत्यंत निराशाजनक गोष्ट आहे.”
फलंदाजांना धरले पराभवासाठी जबाबदार
कोहलीने फलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरले. तो म्हणाला, “आमचे फलंदाज दुसऱ्या डावात मजबूत इराद्याने खेळले नाहीत. पहिल्या डावातही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अशीच गोलंदाजी केली होती. मात्र, त्यावेळी भारतीय फलंदाज धावा बनवण्यासाठी आसुसलेले होते. जी गोष्ट दुसऱ्या डावात दिसली नाही. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे काही चेंडू खरंच सुरेख होते. परंतु, सर्वोत्कृष्ट म्हणता येईल अशी गोलंदाजी नव्हती. फक्त वातावरणच असे तयार झाले की, ज्यामुळे फलंदाजांना धावा बनवण्यास अडचणी आल्या. गोलंदाजांनी आपले कार्य यशस्वीरित्या पार पाडले.”
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– टीम इंडियाचा लाजीरवाणा पराक्रम आणि माजी खेळाडूंच्या तिखट प्रतिक्रिया, चाहत्यांकडूनही मीम्सचा भडीमार
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस