15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्याला घाईघाईने मैदानात उतरवण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, बुमराहच्या डाव्या गुडघ्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान झालेल्या इम्पॅक्ट इंज्युरीनंतर त्याच्या रिकव्हरीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. गुरुवारी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये हजेरी लावल्यानंतर, त्याने ‘बॉडी कंडिशनिंग’ सत्रात भाग घेतला. तो आज शनिवारी पुन्हा गोलंदाजी सुरू करणार आहे.
जरी 32 वर्षीय बुमराहची श्रीलंका विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली असली, तरी त्याचा सहभाग त्याला मिळणाऱ्या फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टी-20 विश्वचषकादरम्यान गुडघ्याचा त्रास बळावल्यानंतर त्याला इंजेक्शन देण्यात आले होते; त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला 8 ते 10 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.
सध्या तरी, 3 ऑगस्ट रोजी संघासोबत श्रीलंकेला जाण्याची बुमराहची शक्यता कमी वाटते. आगामी दिवसांत त्याच्या सरावाचा आणि तंदुरुस्तीचा आढावा घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. कसोटी मालिका सुरू होण्यास अजून वेळ असल्याने, भारतीय संघ व्यवस्थापनाची योजना त्याला पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच संघात समाविष्ट करण्याची आहे. या प्रक्रियेत कोणतीही घाई केली जाणार नाही. भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही धोका पत्करायला तयार नाही आणि त्याला घाईघाईने मैदानात उतरवण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही.






