यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा दुसरा सराव सामना २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पार पडणार आहे. तर स्पर्धा सुरू झाल्यानंतर भारतीय संघाची पहिलीच लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीची मेंटोर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल याने मेंटोर एमएस धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
केएल राहुलने एमएस धोनीच्या शेवटच्या आयपीएल सामन्याबाबत भाष्य करताना म्हटले की, “आम्हाला कोणालाच असे वाटत नाही,की तो एमएस धोनीचा शेवटचा सामना होता. जर एमएस धोनी येणाऱ्या काळातही खेळत राहिला तरी देखील चाहते त्याला खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असतील. यावर्षी देखील चेन्नई सुपर किंग्स संघ ज्याप्रकारे खेळला, तो विजयाचा प्रबळ दावेदार होता. एमएस धोनीचे संघात पुनरागमन झाल्यामुळे बरे वाटते. कारण आम्ही सर्व त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहोत. कर्णधार असताना देखील तो आमच्यासाठी एक मेंटोर होता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जेव्हा तो आमचा कर्णधार होता, त्यावेळी तो ड्रेसिंग रूममध्ये असणे आम्हाला खूप आवडायचे. आम्हाला ती शांतता आवडायची. कठीण काळात आम्ही नेहमीच त्याच्याकडून मदत मागितली आहे. आता ती शांतता पुन्हा परतली आहे. मी सुरुवातीचे दोन तीन दिवस त्याच्यासोबत भरपूर वेळ घालवला. हे खूप मजेशीर होते. मी येणाऱ्या काळात देखील क्रिकेट आणि नेतृत्वासाठी त्याच्याकडून शिकवण घेत राहील.”
तसेच एमएस धोनीच्या फिटनेस बाबत बोलताना तो म्हणाला, “तो आमच्यापैकी कोणालाही कठीण आव्हान देऊ शकतो. तो अजूनही चेंडूला सर्वात लांब मारू शकतो. खूप ताकद आहे त्याच्यात. तसेच खेळपट्टीवर देखील तो जोरात धावतो.”
Extending a very warm welcome to the KING ????@msdhoni is back with #TeamIndia and in a new role!???? pic.twitter.com/Ew5PylMdRy
— BCCI (@BCCI) October 17, 2021
तसेच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात त्याने तुफानी अर्धशतक झळकावले होते आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. या खेळीबाबत बोलताना तो म्हणाला होता की, “मी खूप उत्साहित आहे. विश्वचषक स्पर्धा ही खूप मोठी स्पर्धा आहे. सर्व खेळाडूंचे लक्ष या स्पर्धेवर आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी सराव करत होते. ही स्पर्धा गतवर्षी होणार होती. परंतु त्यानंतर ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. ज्यामुळे आम्हाला संघ तयार करण्यात आणखी वेळ मिळाला. २०१९ मध्ये उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत होणे खूप दु:खद होते. आशा करतो की,आम्ही झालेल्या चुकांमधून शिकू आणि विजय मिळवू.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय वंशाच्या ओमानी क्रिकेटरची पुन्हा तळपली बॅट, बांगलादेशला १२१च्या स्ट्राईक रेटने दिला चोप
ओमानची निर्णायक क्षणी हाराकिरी; विजयामुळे बांगलादेशच्या सुपर १२ च्या आशा कायम






