कोलकाता । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना भारताने ५० धावांनी जिंकला. या सामन्यातील खास गोष्ट म्हणजे भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने या सामन्यात घेतलेली हॅट्रिक.
जेव्हा भारतीय संघाने कोलकाता कसोटी फॉलोव-ऑन नंतर जिंकली होती तेव्हा त्या सामन्यात हरभजन सिंगने हॅट्रिक घेतली होती तर त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता महान खेळाडू सौरव गांगुली. काल जेव्हा कुलदीप यादव या खेळाडूने हॅट्रिक घेतली तेव्हा योगायोगाने गांगुली या सामन्याशी वेगळ्याच नात्याने जोडला गेला होता. यावेळी गांगुली कर्णधार नसून बंगाल क्रिकेट असोशिएशनचा अध्यक्ष आहे.
त्यामुळे गांगुलीसाठी हे दोंन्ही सामने काही खास होते. त्यात सौरव गांगुलीने हा सामना व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणावर कष्ट घेतले आहे.
कुलदीप बद्दल गांगुली काय म्हणाला?
कुलदीप यादवच्या या खेळीबद्दल बोलताना गांगुली म्हणतो, ” हा एक खास स्पेल होता. त्याने सुरेख गोलंदाजी केली. त्याला अजून खूप पुढे जायचं आहे. तो भारतासाठी एक मोठी संपत्ती आहे. “
हरभजन आणि कुलदीपची तुलना करणारा प्रश्न विचारला गेल्यावर गांगुली म्हणतो,
” मला याबद्दल काहीही तुलना करायची नाही. कारण हॅट्रिक मिळणे ही काही सोपी गोष्ट नाही. “
या मालिकेतील तिसरा वनडे सामना होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे २४ सप्टेंबर रोजी होणार आहे.