ऑस्ट्रेलियासारख्या संघाला वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात सुपर फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने पराभवाचा धक्का दिला. भारताने ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सने पराभूत केले. भारताच्या या विजयात केएल राहुल आणि विराट कोहली यांचा मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे, दोघांनाही शतक करता आले नाहीये. मात्र, विराटने या सामन्यात केलेल्या खास खेळीमुळे त्याच्या नावावर जबरदस्त विश्वविक्रम नोंदवला गेला. त्याने सचिन तेंडुलकर यालाही पछाडले.
विराट कोहलीचा विक्रम
झाले असे की, ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात 199 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय (Team India) संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. मात्र, हा सामना भारताने 41.2 षटकात 201 धावा करून जिंकला. भारताकडून यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याने संयमी खेळी साकारली. त्याने 116 चेंडूंचा सामना करताना 85 धावांची शतकापेक्षाही शानदार अशी महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या खेळीत 6 चौकारांचा समावेश होता.
विराटने ही खेळी करताच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो वनडे क्रिकेटमध्ये आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यालाही या विक्रमात मागे सोडले. विराटने वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना एकूण 5517 धावा केल्या आहेत. तसेच, सचिनच्या नावावर 5490 धावांची नोंद होती. या यादीत तिसऱ्या स्थानी रिकी पाँटिंग असून त्याने आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 4186 धावा केल्या होत्या.
विशेष म्हणजे, यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानी असून त्याने 3983 धावा केल्या आहेत, तर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जॅक कॅलिस या यादीत पाचव्या स्थानी आहे. त्याने वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना 3950 धावा केल्या होत्या. महत्त्वाची बाब अशी की, या पाचही खेळाडूंमध्ये विराट आणि रोहित हे दोघेच सक्रिय खेळाडू आहेत. त्यामुळे रोहित आगामी काळात रिकी पाँटिंगचा विक्रम मोडू शकतो. (Most Runs in Successful Chasing in ODIs Virat on Top)
वनडेत आव्हानाचा यशस्वी पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
5517 – विराट कोहली*
5490 – सचिन तेंडुलकर
4186 – रिकी पाँटिंग
3983 – रोहित शर्मा
3950 – जॅक कॅलिस
हेही वाचा-
‘विराटचा कॅच सुटल्यानंतर मी…’, भारताच्या विजयानंतर अश्विनचे खळबळजनक विधान; वाचून तुमच्याही भुवया उंचावतील
‘मी घाबरलो होतो…’, विश्वचषकातील पहिला सामना जिंकल्यानंतर रोहितचे धक्कादायक विधान, असं का म्हणाला?