दिग्गज फलंदाज मुरली विजय मागच्या बऱ्याच दिवसांपासून भारतील संघातून बाहेर आहे. मुरली विजय देशांतर्गत क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत तमिळनाडू संघासाठी खेळतो. मात्र, यावर्षी त्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार नाही. तमिळनाडू संघाच्या निवडकर्त्यांनी विजयला यावर्षी विचारात घेतले नाही. कारण, त्याने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी स्पष्ट नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.
मुरली विजय कोरोना प्रतिबंधक लस घेऊ इच्छित नाही. तसेच क्रिकेट खेळण्यासाठी बायो बबलमध्ये राहण्याचीही त्याची इच्छा नाही, अशी माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या प्रकोपानंतर बीसीसीआयने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक खास नियमावली बनवली आहे. ज्या खेळाडूंना भारतीय संघासाठी खेळायचे आहे, त्यांना या नियमावलीचे पालन करावे लागते. अशात बीसीसीआयने ही नियमावली राज्यांच्या क्रिकेट बोर्ड्सलाही लागू केली आहे. या नियमावलीमधील प्रमुख गोष्टी म्हणजे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आणि बायो बबलचे पालन करणे या दोन आहेत. विजयने मात्र या दोन्ही गोष्टींना नकार दिला आहे.
एका वृत्तपत्राने यासंदर्भात तमिळनाडू क्रिकेट बोर्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, “मुरली विजय लस घेऊ इच्छित नाहीये आणि बीसीसीआयच्या नियमांप्रमाणे खेळाडूंचे लसीकरण गरजेचे आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही स्पर्धेच्या सुरुवातीच्या एक आठवडा आधी त्यांना बायो बबलमध्ये सहभागी व्हावे लागेल आणि तोपर्यंत या बबलमध्ये राहावे लागेल, जोपर्यंत तो संघ स्पर्धेमध्ये कायम राहतो. मात्र, विजय यासाठी तयार नाहीय, त्यामुळे तमिळनाडू क्रिकेट संघाने त्याचे नाव विचारात घेतले नाही.”
जरी विजय लस घेण्यासाठी तयार झाला असता, तरी त्याला संघात जागा मिळवण्यासाठी या वयात पुन्हा फिटनेस सिद्ध करावी लागली असती, असेही या अधिकाऱ्याने पुढे सांगितले आहे. दरम्यान, विजय मागच्या बऱ्याच काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना खेळला होता. त्याव्यतिरिक्त विजय आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जसाठीही अनेक वर्ष खेळला आहे.