१९८७-८८ साली जेव्हा १९ वर्षाखालील टीम इंडिया विंडीज दौऱ्यावर गेली होती तेव्हा त्याने दुसऱ्या डावात विंडीजच्या चक्क ६ विकेट्स घेतल्या आणि थेट बोलवणं आलं ते टीम इंडियाकडून खेळण्याचं. वय होतं केवळ १९ वर्ष २ महिने आणि २४ दिवस.
भारताकडून जेमतेम १७ कसोटी आणि १८ वन-डे सामने खेळणाऱ्या या दिग्गजाचे नाव तरीही भारतातील कट्टर क्रिकेटप्रेमी कधीही विसरणार नाहीत आणि ते नाव म्हणजे नरेंद्र दिपचंद हिरवाणी.
भारतातील अनेक क्रिकेटप्रेमींना ते कसे दिसतात किंवा त्याची कसोटी कारकिर्द कशी राहिली याबद्दल फारशी माहितीही नसेलही परंतु त्यांनी केलेला एक खास विक्रम कुणीही विसरु शकत नाही आणि तो म्हणजे पदार्पणाच्या कसोटी सामन्यात घेतलेल्या १६ विकेट्स.
बाकी क्रिकेटरप्रमाणेच हिरवाणी यांनीही वडिलांच्या व्यवसायात पुढे काम न करता वेगळा मार्ग निवडला. तसं अपेक्षितही आहे कारण आवडं महत्त्वाची. नरेंद्र हिरवाणींचे वडील दिपचंद हिरवाणींचा उत्तरप्रदेशात विटभट्टीचा व्यवयाय होता. हिरवाणींचा जन्म रापती नदीच्या किनारी वसलेल्या गोरखपूरमधील एका सुखवस्तु कुटूंबातील.
माणुस जर ध्येयवेडा असेल तर ते त्याच्या कृतीतून दिसते. हे हिरवाणी यांनाही तंतोतंत लागु होते. बालवयातच गोरखपूरपासून १ हजार किलोमीटर दुर असलेल्या इंदोर येथे त्यांनी आपला मुक्काम हलवला. कारण होते फक्त आणि फक्त क्रिकेट. जेथे सराव करायचाय तिथून जवळच त्यांनी आपली रुम घेतली.
संजय जगदाळे हे नाव भारतीयांनी जेवढ क्रिकेटर म्हणुन ऐकलं नसेल तेवढ क्रिकेटमधील एक चांगले व्यवस्थापक म्हणुन ऐकले आहे. याच जगदाळेंनी हिरवाणीसारख्या बालवयातील क्रिकेटरमधील हिऱ्याची पारख केली.
जगदाळे स्कूल आॅफ क्रिकेटच्या पासअाऊट स्टुडंट्सची यादी तशी मोठी आहे. त्यात व्हीव्हीएस लक्ष्मण, नमन ओझा, मुरली कार्तिक तसेच अमेय खुरासियासारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. हिरवाणी यातील पहिल्या बॅचचे टाॅपरच म्हणावे लागतील.
१९८४-८५मध्ये आपले गुरु जगदाळे ज्या राज्याकडून खेळले त्याच राज्याकडून हिरवाणी यांनी वयाच्या १६व्या वर्षी खेळायला सुरुवात केली आणि याच राज्याकडून ते २००५ पर्यंत क्रिकेट खेळले. पदार्पणाच्या सामन्यातच आठवणीत राहिलं असे १०१ धावा देत ५ विकेट्स घेणारे पदार्पण केले.
पदार्पणाच्या रणजी मालिकेत त्यांनी ४ सामन्यात १३ विकेट्स घेत छाप सोडली. त्यानंतर झालेली १९ वर्षाखालील आॅस्ट्रेलियाविरुद्धची तसेच २५ वर्षाखालील विंडीजविरुद्धची मालिका मात्र हिरवाणींनी जोरदार गाजवली. १९ वर्षाखालील संघात जेव्हा १६ वर्षाखालील खेळाडूची निवड होणे अवघड होते तेव्हा त्यांनी १९ आणि २५ वर्षाखालील अशा दोन्ही संघात तर स्थान मिळवलेच शिवाय याच कामगिरीची दखल घेत आपण आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पणाला सज्ज् असल्याचा स्पष्ट संकेत दिला.
विंडीज मालिकेत दुसऱ्या डावात जेव्हा हिरवाणींनी ६ विकेट्स घेतल्या, त्याच कामगिरीची दखल घेत त्यांनी राष्ट्रीय संघाची दारं खुली झाली.
तेव्हा ते इंदोरला होते आणि त्यांचे गुरु संजय जगदाळे पेपर वाचत होते, त्यात हिरवाणी यांचे नाव वाचताच ते पळत हिरवाणींजवळ गेले आणि त्यांना ही गोड बातमी दिली. ज्या शिष्याला आपण घडविले आहे त्याच्याच कतृत्त्वाची बातमी आपण त्याला देणं यापेक्षा मोठी गोष्ट असु शकत नाही.
शेन वाॅर्नने आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये लेग स्पिन फॅशन बनविण्याची आधीच हिरवाणींनी तिच मुर्तमेढ रोवली होती.
भारताला कसोटीत १९९४ पर्यंत जर कोणत्या संघाने सर्वाधिक त्रास दिला असेल तर तो विंडीज. आणि भारताने १९९४ नंतर जर कोणत्या संघाला कसोटीत त्रास दिला असेल तर तोही विंडीज. विंडीज भारत दौऱ्यावर, सामना चौथा, मैदान चेन्नईच आणि कुणाच तरी कसोटी पदार्पण किंवा मोठी कामगिरी हे भारतात एक इतिहासात समीकरणंच झालं होतं आणि त्याला हिरवाणीही अपवाद ठरले नाही. याच विंडीजविरुद्ध हिरवाणींचे चेन्नईमधील चौथ्या कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले.
पहिला सामना विंडीजने जिंकल्यावर दुसरा आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला होता. चेतन शर्माच्या जागी त्यांना या सामन्यात संधी देण्यात आली होती. आणि मिळालेल्या संधीचे या दिग्गजाने अक्षरश: सोनं केलं
पहिल्या डावात ६१ धावा देत ८ तर दुसऱ्या डावात ७५ धावा देत ८ अशा एकुण १६ विकेट्स त्यांनी या सामन्यात घेतल्या.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी विंडीजच्या पहिल्या ५ पैकी ३ तर तिसऱ्या दिवशी शेवटच्या ५ पैकी ५ विकेट्स घेत एक कायम लक्षात राहिलं असं पदार्पण केलं. पदार्पणातच ८ विकेट कसोटी डावात घेणारे ते यामुळे केवळ चौथे गोलंदाज ठरले.
हा सामना जिंकण्यासाठी भारताने चौथ्या डावात विंडीजसमोर ४१६ धावांचे लक्ष ठेवले आणि हिरवाणींच्या गोलंदाजीने पुन्हा जादू केली आणि संपुर्ण विंडीजचा संघ केवळ १६० धावांत तंबूत परतला. एक हिरवाणी सोडले तर भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला १ पेक्षा जास्त विकेट या सामन्यात घेता आली नाही आणि भारताने ही मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. मजेशीर गोष्ट अशी केली केवळ १ धावेमुळे हा विक्रम हिरवाणींच्या नावावर झाला. हिरवाणी यांनी या सामन्यात १३६ धावा देत १६ विकेट्स घेतल्या होत्या तर राल मास्सी यांनी १९७२मध्ये पदार्पणाच्या सामन्यातच १३७ धावा देत १६ विकेट्स घेतल्या होत्या. याचमुळे हा विक्रम हिरवाणी यांच्या नावावर झाला. हे दोन गोलंदाज सोडले तर कोणत्याही गोलंदाजाने पदार्पणाच्या सामन्यात १२पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या नाहीत.
कसोटी पदार्पणात डावात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या ५ खेळाडूंमध्ये हिरवाणी यांचे नाव चक्क दोन वेळा येते. तर कसोटी पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्यामध्ये पहिल्या क्रमांकावर.
विंडीजविरुद्धच्या या ४ सामन्यांच्या मालिकेत हिरवाणी केवळ १ सामना खेळूनही सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते.
या सामन्यापुर्वी एक दिवस आधी हिरवाणी चेतन शर्मांना म्हणाले होते, की उसका दंडा मारुंगा. आणि सामन्याच्या तिसऱ्या दिवशी व्हीव्हीयन रिचर्ड यांची विकेट घेत त्यांनी तो कारनामा करुनही दाखवला.
अशा या भारताच्या दिग्गज गोलंदाजाचा आज ५०वा वाढदिवस.
He holds the record for the best match figures on Test debut, with a superb 16/136 against West Indies in Chennai in 1988.
Happy birthday to former India leg-spinner Narendra Hirwani! pic.twitter.com/kvSaVKGVn9
— ICC (@ICC) October 18, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–सचिन, धोनी प्रमाणेच कोहली करणार मायदेशात हा मोठा पराक्रम
–पृथ्वी शॉला मिळू शकते रोहित शर्माबरोबर वनडेमध्ये फलंदाजी करण्याची संधी
–सचिनचा हा ‘विराट’ रेकॉर्ड मोडण्याची कोहलीला संधी