भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) सुरू झाला. हा कसोटी सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळला जात असून, भारतीय संघाने नाणेफेक जिंकली. कर्णधार विराट कोहली काही दिवसांपासून विश्रांतीवर होता. त्याने या सामन्यात पुनरागमन केले आणि संघाला नाणेफेक जिंकवून दिली. दरम्यान, भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू जिमी निशामने आश्चर्य व्यक्त केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेपूर्वी तीन सामन्यांची टी२० मालिका खेळली गेली होती. भारताने या तिन्ही सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकली होती. त्यानंतर सुरू झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने संघाला नाणेफेक जिंकवून दिली होती. आता विराटने देखील शेवटच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. एकंदरीत पाहता न्यूझीलंडने भारताच्या या दौऱ्यात एकदाही नाणेफेक जिंकली नाही आणि याच पार्श्वभूमीवर निशामने आश्चर्य व्यक्त केले आहे.
निशामने त्याच्या ट्वीटर पोस्टसाठी प्रसिद्ध आहे. त्याने भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक गमावल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले. निशामने एका संकेतस्थळाचे ट्वीट रिट्वीट करत लिहिले की, ‘०-५ भारताच्या दौऱ्यावर, चांगली स्थिती नाहीय.’ तत्पूर्वी, कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात, जेव्हा न्यूझीलंडने नाणेफेक गमावली होती, तेव्हा देखील निशामने एक खास आणि गमतीशीर ट्वीट केले होते. त्याने यावेळी प्रश्न उपस्थित केला होता की, ‘कोणी जवळून त्या नाण्याला पाहू शकतं का ?’
दरम्यान टी२० मालिकेपासून आतापर्यंत न्यूझीलंड संघाचे नेतृत्व चार वेगवेगळ्या खेळाडूंनी केले आहे. पहिल्या दोन टी२० सामन्यांमध्ये टिम साऊदीने कर्णधारपद सांभाळले होते. तर तिसऱ्या टी२० सामन्यात मिचेल सॅंटनरने नेतृत्व सांभाळले होते. पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार केन विलियम्सनने पुनरागमन केल्यानंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी त्याच्याकडे होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात केनने दुखापतीमुळे माघार घेतली आणि संघाचे नेतृत्व टॉम लॅथम करत आहे. या चौघांपैकी एकालाही भारताविरुद्ध नाणेफेक जिंकता आली नाही.