इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाचा अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) दुबई येथे खेळला जाईल. या अंतिम सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स व ओएन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने येतील. या हाय व्होल्टेज सामन्यात अनेक खेळाडूंवर चाहत्यांची नजर असेल. मात्र, त्याचबरोबर महाराष्ट्रातील क्रिकेटप्रेमी महाराष्ट्राच्याच दोन लढवय्यांनी या सामन्यात काहीतरी खास कामगिरी करावी अशी आशा व्यक्त करत आहेत.
आपल्या संघासाठी तारणहार ठरत आहेत मराठी मुले
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात अंतिम फेरीत पोहोचलेल्या चेन्नईसाठी मराठमोळा ऋतुराज गायकवाड हा खऱ्या अर्थाने तारणहार ठरला आहे. त्याने या स्पर्धेत अतिशय सातत्यपूर्ण कामगिरी करत चेन्नईच्या सलामीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्याने आत्तापर्यंत हंगामात १५ डावांमध्ये ४६ च्या सरासरीने ६०३ धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि ४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, त्याचा स्ट्राइक रेट १३७ आहे. तो सध्याच्या हंगामात सर्वाधिक धावा काढण्याच्या शर्यतीत केएल राहुलपाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्ससाठी महाराष्ट्र संघासाठी खेळणारा राहुल त्रिपाठी सातत्याने लक्षणीय कामगिरी करत आला आहे. त्याने आत्तापर्यंत हंगामात १५ डावांमध्ये ३० च्या सरासरीने ३९५ धावा केल्या आहेत. यात २ अर्धशतके असून, या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १४१ असा राहिला आहे. क्वालिफायर २ मध्ये राहुलने आर अश्विनच्या शेवटच्या षटकात षटकार मारून संघाला रोमांचक विजय मिळवून दिला होता.
लक्षवेधी ठरणार अंतिम सामना
पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने व दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकाताने दिल्लीला पराभूत करत अंतिम फेरीत मजल मारली आहे. हा सामना जिंकून चेन्नई आपले चौथे तर, कोलकाता तिसरे आयपीएल विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
अंतिम सामन्यात ‘कॅप्टनकूल’ धोनी करणार असा विक्रम, जो आजवर ना कुणी केला ना कुणाला जमला
‘हा एक हृदयद्रावक शेवट’, आयपीएल ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचूनही पराभूत झाल्यानंतर रिषभ झाला भावूक
टीम इंडियाला मिळणार राशिद खानसारखा अव्वल फिरकीपटू? सचिनने शोधलाय नवा हिरा!