-आदित्य गुंड
रणजीचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आजपासून सुरू झाले आहेत. गेल्या 2 महिन्यात 38 संघाच्या एकूण 3 गटांचे मिळून 169 सामने खेळण्यात आले. यानंतर आता तीन गटातील मिळून 8 संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुढील आठ संघ या फेरीत एकमेकांविरुद्ध खेळत आहेत.
१. गुजरात
सामने – ८
विजय – ५
पराभव – ०
अनिर्णित – ३
पहिल्या डावात आघाडी – १
गुण – ३५
विदर्भाविरुद्ध अटीतटीच्या सामन्यात मिळवलेला विजय गुजरातचे मनोधैर्य उंचावणारा ठरला.
लक्ष वेधून घेतलेले खेळाडू –
अक्षर पटेल – केवळ चार सामन्यात २४ बळी आणि एका सामन्यात ८९ धावांची उपयुक्त खेळी
२. बंगाल
सामने – ८
विजय – ४
पराभव – १
अनिर्णित – ३
पहिल्या डावात आघाडी – २
गुण – ३२
अडखळत सुरवातीनंतर दुसऱ्या सत्रात जोरदार मुसंडी.साखळीचे राजस्थान आणि पंजाबविरुद्धचे शेवटचे दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
लक्ष वेधून घेतलेले खेळाडू –
मनोज तिवारी – योग्य वेळी कामगिरी उंचावत त्रिशतक झळकावले. शेवटच्या सामन्यात पंजाबविरुद्ध दोन अर्धशतके झळकावत महत्वाची कामगिरी.
शाहबाज अहमद – या हंगामाच्या आधी फक्त २ सामने खेळलेल्या शाहबाजने या हंगामात २९ बळी मिळवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याने २८१ धावाही केल्या आहेत.
३.कर्नाटक
सामने – ८
विजय – ४
पराभव – ०
अनिर्णित – ४
पहिल्या डावात आघाडी – १
गुण – ३१
मुंबई आणि तामिळनाडू या आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांवर विजय. शेवटच्या तीनपैकी दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
लक्ष वेधून घेतलेले खेळाडू –
देवदत्त पडीक्कल – कर्नाटकडून या हंगामात सर्वाधिक ५४७ धावा
४. सौराष्ट्र
सामने – ८
विजय – ३
पराभव – १
अनिर्णित – ३
पहिल्या डावात आघाडी – ४
गुण – ३१
गेल्या वर्षी अंतिम फेरी खेळलेल्या या संघाने याही वर्षी चांगली कामगिरी केली.
लक्ष वेधून घेतलेले खेळाडू –
जयदेव उनाडकत – एक सामना कमी खेळुनही जयदेवने तब्बल ५१ बळी मिळवलेले आहेत.
चेतेश्वर पुजारा – पुजाराने नेहमीप्रमाणे चांगली कामगिरी केली असली तरी तो उपांत्यपूर्व फेरीसाठी उपलब्ध नसेल. त्याच्या अनुपस्थितीत शेल्डन जॅक्सनवर फलंदाजीची जबाबदारी असेल. त्याने या हंगामात सौराष्ट्राकडून दोन शतकांसह सर्वाधिक धावा केल्या आहेत.
५.आंध्रप्रदेश
सामने – ८
विजय – ४
पराभव – २
अनिर्णित – २
पहिल्या डावात आघाडी – ०
गुण – २७
विदर्भाबरोबर सलामीच्या सामन्यात केलेली बरोबरी आणि दिल्लीवर ९ गडी राखून मिळवलेला विजय आंध्रप्रदेशच्या या हंगामाचा हायलाईट म्हणता येईल.
लक्ष वेधून घेतलेले खेळाडू –
के व्ही शशिकांत – ३३ बळी आणि २०३ धावांसकट एक उपयुक्त खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध केले.
रिकी भुई – या हंगामात संघासाठी सर्वाधिक धावा, विदर्भ आणि दिल्ली विरुद्ध मोक्याच्या क्षणी शतके.
६. जम्मू आणि काश्मीर –
सामने – ९
विजय – ६
पराभव – १
अनिर्णित – २
पहिल्या डावात आघाडी – १
गुण – ३९
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांचा या संघाच्या कामगिरीवर मात्र अजिबात परिणाम झालेला नाही. सांघिक कामगिरीचे उत्तम उदाहरण म्हणून ह्या संघाचे नाव घेता येईल. त्यांच्या चार फलंदाजांनी ४०० हुन अधिक धावा काढलेल्या आहेत. पाचव्या फलंदाजाने ३८६ धावा केल्या आहेत. पाच गोलंदाजांनी २० हुन अधिक बळी मिळवलेले आहेत यावरूनसंघाची एकूण कामगिरी ध्यानात यावी.
लक्ष वेधून घेतलेले खेळाडू –
परवेझ रसूल – चार सामने कमी खेळूनही परवेझने ४०३ धावा आणि २५ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे.
अब्दुल समद – अब्दूलने तब्बल ११६ च्या स्ट्राईक रेटने ५४७ धावा केल्या आहेत आणि ४ बळीदेखील मिळवलेले आहेत.
७. ओडिसा –
सामने – ९
विजय – ५
पराभव – २
अनिर्णित – २
पहिल्या डावात आघाडी – १
गुण – ३८
हंगामाच्या सुरुवातीचे तीनही सामने बोनस गुणसकट खिशात घातले. शेवटच्या चारपैकी दोन सामने हरुनही आधीच्या सामन्यांत मिळवलेले बोनस गुण उपयोगी पडत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश.
लक्ष वेधून घेतलेले खेळाडू –
सूर्यकांत प्रधान – ३५ बळी आणि २५५ धावांसकट आपली उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली.
बसंत आणि राजेश मोहंती – बसंतचे ३० आणि राजेशचे ३२ असे दोघांचे मिळून ६२ बळी. अनेक वर्षांपासून बसंत एकट्याने वहात असलेली वेगवान गोलंदाजीची धुरा १९ वर्षीय राजेशच्या मदतीने अधिक धारदार.
८. गोवा
सामने – ९
विजय – ७
पराभव – ०
अनिर्णित – २
पहिल्या डावात आघाडी – १
गुण – ५०
गेल्यावर्षीच्या सुमार कामगिरीमुळे प्लेट गटात ढकलले गेलेल्या गोवा संघाने यावर्षी जोरदार कामगिरी करत प्लेट गटात अग्रस्थान मिळवले.
लक्ष वेधून घेतलेले खेळाडू –
अमित वर्मा – कर्णधार, सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक बळी अशी तिहेरी कामगिरी. तब्बल ७९१ धावा, ४१ बळी मिळवत कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी.
स्मित पटेल – एक द्विशतक आणि दोन शतकांच्या मदतीने ७५१ धावा करत जोरदार कामगिरी.