3 नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडीयमवर पार पडणार आहे. पण सध्या दिल्लीमध्ये हवा प्रदुषण वाढले आहे. परंतू असे असतानाही पहिला टी20 सामना ठरलेल्या नियोजनानुसार दिल्लीतच होणार आहे.
बांगलादेशचे प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. डोमिगो म्हणाले, 3 तासांचा सामना खेळल्याने कोणी मरत नाही. प्रदूषणाची समस्या आमच्या देशातही आहे. तसेच ते असेही म्हणाले की दिल्लीत हवा प्रदूषित होणे मोठी गोष्ट नाही कारण जगातील अनेक देशामध्ये ही समस्या आहे.
पहिल्या टी20 सामन्याआधी बोलताना डोमिंगो म्हणाले, ‘श्रीलंकेच्या संघाला मागच्या वेळी प्रदुषणामुळे संघर्ष करावा लागला होता, हे आम्हाला माहित आहे. पण बांगलादेशमध्येही काहीप्रमाणात प्रदुषण आहे. जगामधेही प्रदूषण आहे. खेळांडू खेळामध्ये व्यस्त आहेत आणि याबद्दल खूप तक्रारी करत नाहीत.’
प्रदुषणाचा त्रास होऊ नये म्हणून बांगलादेशच्या काही खेळाडूंनी तसेच फिरकी गोलंदाजी मार्गदर्शक डॅनियल विट्टोरीने मास्क घातले होते.
बांगलादेश क्रिकेट संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक डोमिंगो पुढे म्हणाले, ‘हा सामना केवळ 3 तासांचा आहे. त्यामुळे थोडा त्रास होईल पण कोणीही मरणार नाही.’
त्याचबरोबर ते म्हणाले, दोन्ही संघांसाठी सारखीच परिस्थिती आहे. ही परिस्थिती आदर्श नसली तरी तूम्ही याबद्दल तक्रार करु शतक नाही.
दिवाळीनंतर दिल्लीतील हवा प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे. त्यामुळे हा सामना दिल्लीतून हलवण्यासाठी मागणी होत होती. परंतू बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने हा सामना दिल्लीमध्येच पार पडेल असे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे या सामन्याला उद्या(3 नोव्हेंबर) भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.