जून महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंड विरूद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली. मात्र या संघात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला स्थान मिळाले नाही.
यावरून अनेकांनी निवड समितीवर टीका केली. हार्दिक पंड्या सारख्या खेळाडूला संघात स्थान द्यायलाच हवे होते, असे मत अनेकांनी मांडले. मात्र आता भारताचे माजी निवड समिती सदस्य सरनदीप सिंग यांनी निवड समितीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
… म्हणून पंड्याचा संघातील स्थानावर हक्क नाही
हार्दिक पंड्याला २०१९ साली पाठीची दुखापत झाली होती. ज्यावर नंतर शस्त्रक्रिया देखील करावी लागली होती. शस्त्रक्रियेनंतर हार्दिकने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. मात्र अनेकदा त्याला दुखापतीमुळे गोलंदाजी करतांना समस्या जाणवल्या. त्यामुळे तो गेल्या काही काळापासून केवळ फलंदाज म्हणून संघात आहे. याच कारणामुळे इंग्लंड दौर्यावर देखील त्याला संघात स्थान मिळाले नाही.
आता सरनदीप सिंग यांनी देखील याच कारणाने हार्दिकला वगळण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, “हार्दिकला कसोटी संघात स्थान न देण्याचा निर्णय समजण्यासारखा आहे. शस्त्रक्रियेनंतर तो नियमितपणे गोलंदाजी करू शकत नाही आहे. मला वाटते की मर्यादित षटकांच्या सामन्यात देखील संघात स्थान मिळविण्यासाठी त्याला वनडे मध्ये १० आणि टी२० सामन्यात ४ षटके गोलंदाजी करावी लागेल. केवळ फलंदाजी करून त्याला संघात स्थान टिकवता येणार नाही.”
हार्दिक गोलंदाजी करत नसेल तर भारतीय संघाचे नुकसान होईल, असेही मत सरनदीप सिंग यांनी यावेळी मांडले. “जर हार्दिक गोलंदाजी करत नसेल तर संघाच्या समतोलावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला एक अतिरिक्त गोलंदाज खेळवावा लागेल, आणि सूर्यकुमार सारख्या फलंदाजांना संघाबाहेर ठेवावे लागेल. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांमध्ये आपण हे घडताना पाहिले आहे. केवळ पाच गोलंदाजांसह तुम्ही सामन्यात नाही उतरू शकत. संघाकडे आता वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा असे इतरही अष्टपैलू खेळाडूंचे पर्याय आहेत. जर हार्दिक गोलंदाजी करणार नसेल तर हे खेळाडू त्याची जागा घेतील”, असे स्पष्ट मत सरनदीप सिंग यांनी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेले ११ भारतीय, आज असतात तरी कुठे?
दहा वर्षांनंतर इयान बेलने ‘त्या’ विवादीत रनआउटबद्दल सोडले मौन; म्हणाला, “माझीच चूक होती, मी…”