काही दिवसांपूर्वीच यूएई आणि ओमानमध्ये आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे यजमानपद बीसीसीआयकडे होते. तसेच या स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, भारतीय संघाला या स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्या सामन्यात पाकिस्तानसोबत, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नव्हता. आता सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे भारतीय संघ साखळी फेरीतून बाहेर झाला होता. २०१२ टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर ही पहिलीच वेळ होती, जेव्हा भारतीय संघाला साखळी फेरीतून बाहेर व्हावे लागले होते. भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरी नंतर अनेकांनी भारतीय संघावर टीका केली होती. परंतु, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काहीच वक्तव्य केले नव्हते. अखेर सौरव गांगुली यांनी या निराशाजनक कामगिरीवर आपले मौन सोडले आहे.
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्रकाराने विचारले की, “द्विपक्षीय मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर देखील भारतीय संघ टी२० विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीतून बाहेर का झाला?”
या प्रश्नाचे उत्तर देत सौरव गांगुली म्हणाले की, “खरं सांगू तर २०१७ आणि २०१९ चा भारतीय संघ चांगला होता. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आपण अंतिम सामन्यात पराभूत झालो होतो. त्यावेळी मी समालोचन करत होतो. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत आपण सर्वांना पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. परंतु, उपांत्य फेरीत न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. एक वाईट सामना संपूर्ण स्पर्धा खराब करून टाकतो. यासह दोन महिन्यांची मेहनत पाण्यात गेली.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “मी भारतीय संघाच्या कामगिरीवर निराश आहे. मला वाटते की, ही गेल्या ४ ते ५ वर्षातील भारतीय संघाची सर्वात निराशाजनक कामगिरी आहे.”
यादरम्यान सौरव गांगुली यांनी कुठल्या एका खेळाडूवर टीका करत भारतीय संघाची नेमकी कुठे चूक झाली हे नाही सांगितले. परंतु, त्यांनी म्हटले की, “अनेकदा भारतीय संघ मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. भारतीय संघाने संपूर्ण क्षमता असताना देखील १५ टक्के मेहनत घेतली.”
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला ‘या’ दिवशी होणार सुरुवात, मोठी अपडेट आली समोर
सर्वात वयोवृद्ध क्रिकेटपटूचे निधन, वयाच्या ११० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास