मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३४ वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करत असताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने ३० चेंडूंमध्ये ३३ धावांची खेळी केली होती. त्याची फलंदाजी पाहून असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, मुंबई इंडियन्स संघ या डावात १८० धावांचा पल्ला गाठू शकतो. परंतु सुनील नरेनने त्याला शुबमन गिलच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले. त्यामुळे मुंबईला अवघ्या १५५ धावा करण्यास यश आले.
सामन्यानंतर रोहितला बाद करणाऱ्या सुनील नरेनला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यासह त्याने आयपीएल स्पर्धेतील मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून गोलंदाजी करताना सुनील नरेनने ४ षटकांत अवघ्या २० धावा खर्च करत एक गडी बाद केला. या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने म्हटले की, “क्रिकेटच्या कुठल्याही स्वरूपात रोहितला बाद करणे खूप मोठी गोष्ट असते. तो एक महत्वाचा खेळाडू आहे.”
रोहितला बाद करताच सुनील नरेनने आयपीएल स्पर्धेत कुठल्याही एका फलंदाजाला सर्वाधिक वेळेस बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जहीर खान आणि संदीप शर्मा यांची बरोबरी केली आहे. जहीर खानने एमएस धोनीला ७ वेळेस बाद केले होते. तर संदीप शर्माने देखील विराट कोहलीला ७ वेळेस बाद केले आहे. दरम्यान गुरुवारी (२३ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात सुनील नरेनने सातव्यांदा रोहित शर्माला बाद केले आहे.
मुंबई इंडियन्स संघाला १५५ धावा करण्यात आले यश
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघातील सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी जोरदार सुरुवात करून दिली होती. क्विंटन डीकॉकने ४२ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५५ धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने ३० चेंडुंमध्ये ३३ धावांची खेळी केली होती. परंतु त्यानंतर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. २० षटक अखेर मुंबई इंडियन्स संघाला ६ बाद १५५ धावा करण्यात यश आले होते.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ७ गडी राखून विजय
या धावांचा पाठलाग करताना राहुल त्रिपाठीने ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने नाबाद ७४ धावांची खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने ३९ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ३ षटकारांचा साहाय्याने ५३ धावांचे बहुमूल्य योगदान देत, हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरच्या भात्यातील ‘घातक अस्त्र’ अय्यरची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्यामागची कहाणी
‘शांत’ कृष्णाचा ‘तापट’ पोलार्डशी पंगा, भर मैदानातील खडाजंगीचा व्हिडिओ होतोय व्हायरल
मुंबईचा ‘कारभारी’ केकेआरविरुद्ध ठरला लय भारी! चौकारांचा ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच फलंदाज