अबुधाबी। टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ फेरीत बुधवारी (३ नोव्हेंबर) भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात सामना झाला. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला. भारताचा हा या टी२० विश्वचषकातील पहिला विजय आहे. तसेच या विजयामुळे भारताच्या उपांत्य फेरीत पोहचण्याचा आशा कायम राहिल्या आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २ बाद २१० धावा केल्या आणि अफगाणिस्तानला २११ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला २० षटकांमध्ये ७ बाद १४४ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना सहज जिंकला.
भारताने दिलेल्या २११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानकडून हजरतुल्ला झझाई आणि मोहम्मद शेहजादने सलामीला फलंदाजी केली. पण, त्यांना चांगली सुरुवात देता आली नाही. तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शेहजादला मोहम्मद शमीने शुन्यावर माघारी धाडले. तसेच त्याच्या पुढच्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने हजरतुल्ला झझाईला १३ धावांवर बाद केले. यानंतर रेहमानुल्ला गुरबाज आणि गुलबदिन नाईब यांनी थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण, ७ व्या षटकात गुरबाजला रविंद्र जडेजाने १९ धावांवर झेलबाद केले. त्याचा अप्रतिम झेल हार्दिक पंड्याने घेतला. १० व्या षटकात आर अश्विनने गुलबदिनला १८ धावांवर पायचीत केले. आर अश्विननेच १२ व्या षटकात नजीबुल्ला झद्रानला त्रिफळाचीत करत अफगाणिस्तानला ५ वा धक्का दिला. मात्र, यानंतर मोहम्मद नबी आणि करीम जनातने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत अर्धशतकी भागीदारी केली. पण, ही जोडी १९ व्या षटकात मोहम्मद शमीने तोडली. त्याने ३५ धावांवर नबीला बाद केले. याच षटकात राशिद खान शुन्यावर बाद झाला. दरम्यान, नियमित कालांतराने विकेट्स गेल्याने लक्ष्याचा पाठलाग अफगाणिस्तानसाठी नियंत्रणाबाहेर गेला. अखेर करीम जनत ४२ धावांवर आणि शराफुद्दीन अश्रफ २ धावांवर नाबाद राहिले. २० षटकात अफगाणिस्तानने ७ बाद १४४ धावा केल्या.
भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच आर अश्विनने २ विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १ विकेट घेतली.
रोहित-राहुलची अर्धशतकं
या सामन्यात अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीपासूनच आक्रमण करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नाही. या दोघांनी पाहाता पाहाता शतकी सलामी देताना वैयक्तिक अर्धशतकही पूर्ण केली. राहुल आणि रोहितने टी२० मध्ये शतकी भागीदारी करण्याची ही चौथी वेळ ठरली आहे.
रोहितने १२ व्या षटकात नवीन-उल-हकच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत अर्धशतक केले, त्यानंतर १३ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर केएल राहुलने गुलबदिन नाईबला चौकार ठोकत अर्धशतक केले. रोहित आणि राहुलने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे भारताने १४ षटकात बिनबाद १३५ धावा केल्या होत्या..
मात्र, या दोघांची जोडी तोडण्यात अखेर करिम जनातला यश आले. त्याने १५ व्या षटकात रोहित शर्माला मोहम्मद नबीकडे झेल देण्यास भाग पाडले. रोहितने ४७ चेंडूत ७४ धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ३ षटकार मारले. त्यानंतर १७ व्या षटकात केएल राहुललाही गुलबदिन नाईबने त्रिफळाचीत केले. राहुलने ४८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटरांसह ६९ धावा केल्या.
अखेर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्याने आक्रमक खेळ करत भारताला २०० धावांचा टप्पा पार करुन दिला. रिषभने १३ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह २७ धावांची खेळी केली, तर हार्दिकने १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३५ धावा केल्या. भारताने २० षटकांत २ बाद २१० धावा केल्या.
असे आहेत संघ –
या सामन्यासाठी अंतिम ११ जणांच्या संघात भारतीय संघाने २ बदल केले आहेत. भारतीय संघात सूर्यकुमार यादव आणि आर अश्विनचे पुनरागमन झाले आहे. सूर्यकुमारला इशान किशनऐवजी संधी मिळाली आहे, तर अश्विनला वरुण चक्रवर्तीच्या ऐवजी संधी देण्यात आली आहे. अश्विन १५७७ दिवसांनंतर भारताकडून टी२० सामना खेळणार आहे. अफगाणिस्तानने अंतिम ११ जणांच्या संघात मुजीब उर रेहमानला या सामन्यासाठी खेळवलेले नाही.
असे आहेत ११ जणांचे संघ –
अफगाणिस्तान: हजरतुल्ला झझाई, मोहम्मद शहजाद (यष्टीरक्षक), रहमानुल्ला गुरबाज, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी (कर्णधार), गुलबदिन नाईब, शराफुद्दीन अश्रफ, राशिद खान, करीम जनात, नवीन-उल-हक, हमीद हसन.
भारत: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.