क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पार पडला. या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाने सोमवारी (१६ ऑगस्ट) इंग्लंड संघावर १५१ धावांनी विजय मिळवला आहे. यासह या मालिकेत १-० ने आघाडी देखील घेतली आहे.
यासह भारतीय संघाने तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना एकप्रकारे ७५ व्या स्वातंत्र्यदिनाची भेट दिली आहे. भारताने १५ ऑगस्टला ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
भारतीय संघाचा जल्लोष
या सामन्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. या दिवशी अखेरची ९ षटके बाकी असताना इंग्लंडकडे सामना वाचवण्यासाठी केवळ २ विकेट्स शिल्लक होेत्या. तर भारताला विजयासाठी २ विकेट्स घेण्याची गरज होती. याचवेळी मोहम्मद सिराजने जोस बटलरला आणि जेम्स अँडरसनला एकाच षटकात बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
जेव्हा सिराजने अँडरसनच्या रुपात इंग्लंडची अखेरची विकेट घेतली, त्यावेळी भारतीय संघाने मोठा जल्लोष केला. यावेळी लॉर्ड्सच्या बाल्कनीतून भारतीय संघाचे अन्य खेळाडू, तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्यांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. तर, मैदानात खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारत आनंद साजरा केला. यावेळी खेळाडूंमध्ये मोठा उत्साह दिसून आला. भारताचा लॉर्ड्सवरील हा १९८६ आणि २०१४ नंतर मिळवलेला तिसरा कसोटी विजय आहे.
https://twitter.com/SonySportsIndia/status/1427325166405636108
या सामन्यातील पाचव्या दिवशी (१६ ऑगस्ट) भारतीय संघातील गोलंदाजांनी इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ केली होती. भारतीय संघातील मुख्य फलंदाज माघारी परतल्यानंतर इंग्लंड संघाने भारतीय संघाला बॅकफूटवर टाकले होते. परंतु, जसप्रीत बुमराह (३४*) आणि मोहम्मद शमी (५६*) या दोघांनी मिळून इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपले. या दोघांनी मिळून ८९ धावांची भागीदारी केली होती. यानंतर विराट कोहलीने २९८ धावांवर डाव घोषित केला होता. इंग्लंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७२ धावांची आवश्यकता होती.
दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांचा बोलबाला
भारतीय संघाने दिलेल्या २७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या सलामीवीरांना फार काळ टिकता आले नाही. दोघेही भोपळाही न फोडता माघारी परतले होते. त्यानंतर पहिल्या डावात शतक झळकावणारा कर्णधार जो रूट याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो देखील या डावात मोठी खेळी करू शकला नाही. तो ३३ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
शेवटी जोस बटलरने एकहाती झुंज दिली. परंतु, ही झुंज देखील अपयशी ठरली. तो २५ धावा करत तंबूत परतला होता. इंग्लंडचा संपूर्ण डाव १२० धावांवर संपुष्टात आला आणि भारताने हा सामना जिंकला. भारताकडून दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तसेच जसप्रीत बुमराहने ३, इशांत शर्माने २ आणि मोहम्मद शमीने १ विकेट घेतली.(India beat England by 151 runs in first test at lord’s)
भारतीय गोलंदाजांची कामगिरी
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने हा सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात दोन्ही डावात मिळून ८ इंग्लिश फलंदाजांना माघारी धाडले. तसेच भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख जसप्रीत बुमराहने सामन्यात ३ गडी बाद केले. तर ईशांत शर्माला ५ आणि मोहम्मद शमीला ३ गडी बाद करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
अरर! जो रुटचे शतक होऊनही इंग्लंडवर पहिल्यांदाच ओढवली ‘अशी’ नामुष्की
टीम इंडियाचा मायदेशाबाहेर ‘या’ मैदानांवर राहिलाय दबदबा, इंग्लंडच्या लॉर्ड्सचाही समावेश
खट्याळ पंतसोबत खुद्द कर्णधारानेच केली मस्ती, भर मैदानात कानात अडकवलं ब्रेसलेट, पाहून खदखदून हसाल






