इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय कसोटी संघासमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. गुरुवारी (१५ जुलै) भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली आहे. याबरोबरच आणखी भारतीय संघातील कोणते सदस्य क्वारंटाईन आहेत, याबद्दलही बीसीसीआयने माहिती दिली आहे.
बीसीसीआयने गुरुवारी प्रसिद्धपत्रक जाहीर करत भारतीय संघात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्याची माहिती दिली. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पंत ८ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. तो बीसीसीआयने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दिलेल्या ३ आठवड्यांच्या सुटीदरम्यान भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये नव्हता. त्यामुळे, तो ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तिथेच तो क्वारंटाईन झाला आहे. त्याचे आणखी २ कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तो डरहॅम येथे भारतीय संघात सामील होऊ शकतो.
तसेच बीसीसीआयने माहिती दिली की गरानी यांचा कोरोना चाचणी अहवाल १४ जुलै रौजी पॉझिटिव्ह आला. त्यावेळी ते भारतीय संघाच्या हॉटेलमध्येच होते. तसेच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात असलेले भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे. या ४ जणांना लंडनमधील हॉटेलमध्ये १० दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.
याबरोबरच बीसीसीआयने अशीही माहिती दिली आहे की या महिन्याच्या सुरुवातीलाच भारतीय संघातील सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच आणखी धोका टाळण्यासाठी भारतीय संघाच्या सातत्याने चाचणी करण्यात येत आहे.
???? NEWS: #TeamIndia off to Durham; Two members test positive
Wicket-keeper batsman Rishabh Pant, who tested positive for COVID-19 on 8th July, nears completion of his self-quarantine period while training assistant/net bowler Dayanand Garani has tested positive.
Details ????
— BCCI (@BCCI) July 15, 2021
भारतीय संघाला सुटी महागात
भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर आल्यानंतर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यात भारताला न्यूझीलंड विरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर भारताला ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. पण त्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय संघातील सदस्यांना ताजातवाना होण्यासाठी साधारण ३ आठवड्यांची सुटी दिली होती. ही सुटी भारतीय संघासाठी महागात पडत असल्याचे दिसत आहे.
भारतीय संघाचे डरहॅमला सराव शिबिर
जवळपास ३ आठवड्यांच्या सुटीनंतर भारतीय खेळाडू इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करण्यासाठी डरहॅम येथे आले आहेत. भारतीय संघ डरहॅम येथे सराव शिबिर पूर्ण करुन आणि सराव सामना खेळल्यानंतर इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी नॉटिंगघमला रवाना होईल.
महत्त्वाच्या बातम्या –