गुवाहाटी । नवनाथ पडतरे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांच्यासारख्या नावलौकिक मिळविलेल्या नेमबाजांपासून अगदी खेलो इंडियात छाप पाडणा-या समर्थ मंडलिक याच्यापर्यंत अनेक नेमबाजांना घडविणारे प्रशिक्षक अजित पाटिल हे नाव आजही पडद्यामागे राहिले आहे. आसाम, गुवाहटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया २०२० स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्याशी स्पर्धा केंद्रावर साधलेला संवाद.
-कुस्ती अशी ओळख असणा-या कोल्हापूरमधून आता अॅथलेटिक्स, सायकलिंग, फुटबॉल, हॉकी, नेमबाजी अशा विविध क्रीडा प्रकारातही खेळाडू चमकत आहेत. हे कशामुळे साध्य झाले?
आज कोल्हापूरमधील खेळाडू चमकत आहेत यात शंकाच नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे यश मिळविण्यासाठी असलेली भूक हे सांगता येईल. आपली परिस्थिती काय आहे याचा विचार न करता हे खेळाडू अशा परिस्थितीतूनही आपल्याला यश कसे मिळविता येईल याचा विचार करतात. त्याचवेळी आपल्याला मिळत असलेल्या सुविधा आणि अधिक सुविधा मिळविण्यासाठी ते करत असलेली धडपड यात त्यांची ताकद दिसून येते. ही ताकदच त्यांना कणखर बनवते.
-कुमार गटात असताना खेळाडूची कामगिरी उंचावत असते.पण, जेव्हा तो एकेक पायरी चढून वर येत राहतो तेव्हा तो मागे पडतो हे कशामुळे होते?
याचा एक भाग म्हणजे कुमार गटात खेळत असताना खेळाडूचे लक्ष्य आपल्या कामगिरीवर अधिक असते. तो सातत्याने त्याचाच विचार करत असतो. जेव्हा तो वरिष्ठ पातळीवर येतो तेव्हा त्याच्यावर दडपण असते. अशात त्याचे चित्त विचलित होते. त्यामुळे तो सातत्य दाखवू शकत नाही. अशा वेळी प्रशिक्षकाची भूमिका महत्वाची ठरते. त्याच्यावर नियंत्रण ठेवून त्याची मानसिकता कशी कणखर बनवायची हे प्रशिक्षकाने साधल्यास ही उणीव दूर होऊ शकेल.
-खेळाडू घडविण्यात प्रशिक्षकाची भूमिका किती महत्वाची ठरते. खेळाडूच्या यशात प्रशिक्षकाचा हात तितकाच महत्वाचा असतो. काय सांगाल याबाबत?
खेळाडूच्या यशात सर्वप्रथम त्याची मेहनत महत्वाची असते. पण, त्याला त्यासाठी तयार करणे आणि प्रेरित करणे हे प्रशिक्षकाचे काम असते. प्रशिक्षक आणि खेळाडू हे एक नाते असते. ते जेवढे घट्ट होईल तेवढे चांगले. यासाठी प्रशिक्षकाला खेळाडू आणि खेळाडूला प्रशिक्षण समजणे सर्वात महत्वाचे आहे. हे सूर जेव्हा जुळून येतात तेव्हा ख-या अर्थाने हे नाते दृढ होते आणि एक चांगला खेळाडू, तसेच प्रशिक्षक नावारुपाला येतो.
-खेळाडू जसे दुर्लक्षित राहतात, तसेच आपल्याकडे प्रशिक्षकही दुर्लक्षित राहतात. यात किती सत्यता आहे?
नेमबाजीबाबत म्हणाल, तर ते खरे म्हणता येईल. मी पूर्णवेळ नेमबाजी प्रशिक्षक म्हणूनच काम करत आहे. अॅकॅडमी किंवा राज्याचा खेळाडू घडविताना प्रशिक्षकाला देखील तेवढेच प्रोत्साहन मिळायला हवे. ते मिळणार नसेल, तर कधीच खेळाडू घडणार नाहीत. प्रशिक्षकाच्या नियुक्तीचा विचार करताना दिर्घ मुदतीचा विचार होणे आवश्यक आहे. त्याला निर्णयाचे स्वातंत्र्य दिल्यास चांगले खेळाडू घडणार आहेत.
-खेलो इंडियाच्या निमत्ताने मिळालेल्या व्यासपीठाविषयी काय म्हणाल. यावर्षी कशी कामगिरी होत आहे?
हे व्यासपीठ चांगलेच आहे. अनेक उदयोन्मुख खेळाडू अनुभवी खेळाडूंच्या साथीत येथे चमकत आहेत. एकूण त्यांना स्पर्धात्मक आत्मविश्वास उंचावण्यासाठी या स्पर्धेचा फायदा होईल. समर्थ मंडलिक सारखे काही उदयोन्मुख नेमबाज येथे चमकत आहेत. त्यांनी आपली क्षमता येथे सिद्ध केली आहे आता गरज आहे ती त्यांच्या गुणवत्तेला पैलू पाडण्याची. तर ही गुणवत्ता कधीच व्यर्थ जाणार नाही.