भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेला बुधवारी (१७ नोव्हेंबर) सुरुवात झाली. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने पाच विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य १९.४ षटकात गाठले. सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या जवळपास प्रत्येक खेळाडूने त्याची भूमिका चोखपणे पार पाडली.
आपण या लेखात भारतीय संघातील अशा पाच खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली आणि संघाला विजय मिळवून दिला.
१) सूर्यकुमार यादव – सूर्यकुमार यादवने पहिल्या टी२० सामन्यात महत्वाची खेळी केली आणि भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. सलामीवीर केएल राहुल स्वस्तात बाद झाल्यानंतर त्याने भारतीय संघाचा डाव सावरला आणि रोहित शर्माची चांगल्या प्रकारे साथ दिली. त्याने या सामन्यात स्वतःचे टी२० आंतरराष्ट्रीयमधील तिसरे अर्धशतक साकारले. त्याने सामन्यात एकूण ४० चेंडूंचा सामना केला आणि यामध्ये ६२ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी सोबतच रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागीदारीदेखील पार पाडली.
२) रोहित शर्मा – या सामन्यात भारतीय संघाला रोहित शर्माच्या रूपात नवीन टी२० कर्णधार मिळाला आहे. रोहित या सामन्यात त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांना लक्ष्य केले आणि फटकेबाजी सुरू केली. असे असले तरी, तो या सामन्यात त्याच्या अर्धशतकापासून थोड्या अंतरावर असताना बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ४८ धावा केल्या आणि यादरम्यान दोन खेळाडूंसोबत अर्धशतकी भागीदारी केली.
३) रविचंद्रन अश्विन – भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला या सामन्यात संधी दिली गेली आहे. त्याने या संधीचा पुरेपूर फायदा करून घेतला. त्याने सामन्यादरम्यान एकाच षटकात न्यूझीलंडच्या दोन महत्वाच्या खेळाडूंना बाद केले आणि त्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. त्याने त्याच्या चार षटकांच्या स्पेलमध्ये २३ धावा दिल्या आणि २ विकेट्स घेतल्या.
४) भुवनेश्वर कुमार – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार मागच्या काही दिवसांपासून खराब फॉर्मशी झगडत होता, पण या सामन्यात तो पुन्हा त्याच्या लयात परतल्याचे दिसले आहे. त्याने त्याच्या जुन्या अंदाजात चेंडू स्विंग केला आणि डावाच्या पहिल्याच षटकात एक विकेट घेऊन न्यूझीलंडला मोठा झटका दिला. त्याने या सामन्यात चार षटकात २४ धावा दिल्या आणि दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
५) रिषभ पंत – भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने या सामन्यात मोठी खेळी केली नाही, पण त्याने शेवटच्या क्षणांत संघाला विजय मिळवून दिला. त्याने या सामन्यात १७ चेंडूत १७ धावा केल्या. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला आणि शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाची सुरु झाली २०२२ टी२० विश्वचषकाची तयारी? कर्णधार रोहित शर्माने दिले संकेत
वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये स्म्रीती मंधनाचा शतकी धमाका! ‘असा’ पराक्रम करणारी पहिलीच भारतीय