कोणताही क्रिकेट सामना जिंकण्यासाठी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाबरोबर गोलंदाजीही तितकीच महत्त्वाची असते. ५ फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड संघात सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाची गोलंदाजी अधिक मजबूत असल्याचे म्हटले जात आहे. पाहुण्या इंग्लंडमध्ये सुद्धा काही असे गोलंदाज आहेत, ज्यांच्यापुढे भल्याभल्या फलंदाजाचे पाय थरथरतात. परंतु त्याच गोलंदाजांना भारतातील मैदानावर खास कामगिरी करता आली नसल्याचे दिसून आले आहे. त्याच गोलंदाजांचा आम्ही या लेखात आढावा घेतला आहे.
१) ख्रिस वोक्स :
ख्रिस वोक्स हा इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. वोक्स प्रामुख्याने गोलंदाजी करतो. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरवात २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. कसोटी कारकिर्दीत आजवर त्याने एकूण ३८ सामने खेळले असून ३० पेक्षा कमी सरासरीने ११२ विकेट्स घेतल्या आहेत. तर भारतात ३ कसोटी सामने खेळताना ८१.३३ च्या सरासरीने अवघ्या ३ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ६ धावांवर १ विकेट ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी सरासरी राहिली आहे.
२)स्टुअर्ट ब्रॉड:
नुकत्याच पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत स्टुअर्ट ब्रॉडची कामगिरी खूप प्रभावी राहिली होती. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५०० विकेट्सचा आकडा पार केला आहे. मात्र भारतीय भूमीवरील त्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ब्रॉडने आतापर्यंत भारतात खेळल्या गेलेल्या ६ कसोटी सामन्यातील ९ डावात खेळताना ५३.९० च्या सरासरीने १० विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ३३ धावांवर ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
३)जेम्स अँडरसन:
इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाजांमध्ये जेम्स अँडरसन हा सर्वात महत्त्वाचा गोलंदाज मानला जातो. कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. कसोटीमध्ये ६०० विकेट्स घेण्याची विशेष कामगिरी त्याने केली आहे. तथापि भारतात त्याचा रेकॉर्ड चांगला नाही. अँडरसनने भारतात खेळल्या गेलेल्या १० कसोटी सामन्यांतील १८ डावांमध्ये ३३.४६ च्या सरासरीने २६ खेळाडूंची विकेट्स घेतली आहे. तर ४० धावांवर ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.
४)बेन स्टोक्स:
बेन स्ट्रोक हा इंग्लंडच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहे. पण गरजेनुसार तो गोलंदाजीही करतो. पण भारतीय भूमीवरील त्याची कामगिरी जास्त खास नाही. उजव्या हाताच्या या वेगवान गोलंदाजाने भारतात ५ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील ८ डावात ४४.६२ च्या सरासरीने ८ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ७३ धावांमध्ये ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कहर! १२ चेंडूत अर्धशतक झळकावलं अन् २७ चेंडूत सामनाही गुंडाळला, पाहा व्हिडिओ
इंग्लंड संघाच्या चिंतेत वाढ, दुखापतीमुळे ‘हा’ धुरंधर पहिल्या दोन कसोटीतून बाहेर
विराट- रोहित नव्हे तर पुजारा करेल कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी