चेन्नई येथे १८ फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. अंतिम यादीतील २९८ खेळाडूंपैकी ५७ खेळाडूंवर बोली लागली. या लिलावामध्ये देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या अनेक खेळाडूंना विविध संघात निवडण्यात आले. केरळचा युवा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद अझहरुद्दीन याला देखील विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने खरेदी केले. आरसीबीचा भाग झाल्यानंतर अझहरुद्दीनची प्रतिक्रिया आली आहे.
आरसीबीमध्ये तुझे स्वागत आहे
आक्रमक फलंदाज असलेल्या अझहरुद्दीनवर मोठी बोली लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आरसीबी संघ व्यवस्थापनाने त्याच्यासाठी पहिली बोली लावल्यानंतर इतर संघांनी लिलावात भाग घेतला नाही. त्यामुळे अझहरुद्दीन आपल्या आधारभूत किमतीत म्हणजेच २० लाख रुपयांमध्ये विकला गेला. त्यामुळे सलामीवीर आणि यष्टीरक्षक असलेला अझहरुद्दीन प्रथमच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
या निवडीनंतर अझहरुद्दीनने एका मुलाखतीत सांगितले, “लिलावाच्या अवघ्या दोन मिनिटांनंतरच मला विराट कोहलीचा संदेश आला. त्याने लिहिले होते की, आरसीबी परिवारात तुझे स्वागत आहे. पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. त्याच्या या संदेशानंतर मी भावूक झालो. मी कधी असा विचारही केला नव्हता. विराट माझा आदर्श आहे आणि त्याच्यासोबत खेळणे माझे स्वप्न होते. आता त्याच्याच संघात मला संधी मिळाली आहे.”
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतून आला प्रसिद्धीझोतात
मागील महिन्यात संपलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफमधून अझहरुद्दीन प्रकाशझोतात आला होता. मुंबईविरुद्धच्या साखळी सामन्यात त्याने अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकावले होते. केरळसाठी खेळणाऱ्या अझहरुद्दीनचा टी२० क्रिकेटमधील स्ट्राइक रेट १४२ इतका आहे. आरसीबीमध्ये विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स व ग्लेन मॅक्सवेल यासारख्या आंतरराष्ट्रीय दिग्गजांकडून त्याला भरपूर काही शिकता येईल. अझहरुद्दीनने आत्तापर्यंत केरळसाठी २४ टी२० खेळताना २२.६० च्या सरासरीने ४५१ धावा काढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेकाळी सूर्यकुमारने घेतला होता विराटशी पंगा, आता त्याच्याच नेतृत्त्वाखाली खेळणार टी२० क्रिकेट