आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 38 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या संघात झाला. या सामन्यात पंजाबने दिल्लीचा 5 गडी राखून पराभव केला. मागील सामन्यातही पंजाबने 2 सुपर ओव्हरमध्ये मुंबईला पराभूत केले होते. 2 सुपर ओव्हरपर्यंत चाललेल्या या सामन्यानंतर रात्रभर झोपू शकलो नाही, असे पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सांगितले.
राहुल म्हणाला, ‘मागील दोन सामन्यांत आम्ही गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या २ संघांना पराभूत केल्याची चर्चा केली होती. शेवटच्या सामन्यानंतर मला झोप येत नव्हती. आम्ही तो सामना आधीच समाप्त करायला पाहिजे होता आणि त्याला सुपर ओव्हरपर्यंत न्यायला नव्हते पाहिजे. त्या सामन्याने सभ्य रहायला शिकवले. शेवटी खेळ आपल्या सर्वांपेक्षा मोठा आहे’.
बलाढ्य दिल्लीला केले पराभूत
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा अनुभवी फलंदाज शिखर धवनने फाटकावलेल्या नाबाद 106 धावांनतरही पंजाबने त्यांचा पराभव केला. निकोलस पूरनच्या 53 धावांच्या मदतीने पंजाबने 19 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 167 धावा करत सामना ५ विकेट्सने जिंकला.
या सामन्यानंतर बोलताना राहुल म्हणाला, “जेव्हा तुम्ही सहा फलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडूला संघात स्थान देता तेव्हा अव्वल चार फलंदाजांपैकी एका फलंदाजाला खेळपट्टीवर टिकून खेळावे लागते. आम्हाला यावर विचार करावा लागेल. आम्ही यात सुधारणा करू.”
गोलंदाजांची केली प्रशंसा
आपल्या गोलंदाजांचे कौतुक करताना राहुल म्हणाला की, “मोहम्मद शमीच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. प्रत्येक सामन्यात तो चांगली कामगिरी करत आहे. युवा गोलंदाज अर्शदीपसिंगने पॉवरप्लेमध्ये दोन आणि अखेरच्या षटकांत एक षटक फेकले. त्याने उत्तम यॉर्कर चेंडू फेकले.”
10 धावा पडल्या कमी
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की,”मला वाटते की आम्ही 10 धावा कमी केल्या. तथापि, आम्ही या सामन्यातून बरेच काही शिकलो. शिखर धवन एक महान फलंदाज आहे. त्याच्या खेळीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले. तुषार देशपांडेला या सामन्यात काही खास कामगिरी करता आलेली नाही. या अपयशातून आम्ही बरेच काही शिकलो.”
धवनचे केले कौतुक
पुढे बोलताना अय्यर म्हणाला, “शिखरने परिस्थितीशी जुळवून घेतले. चेंडू थांबून येत आहे असे तो खेळपट्टीवर येणाऱ्या नवीन फलंदाजाला सांगत असे. या पराभवानंतरही चांगली गोष्ट म्हणजे खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाला नाही. आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते. आम्ही लवकरच पुनरागमन करू.”
जबाबदारी सांभाळून चांगले वाटले
सामनावीर ठरलेला धवन म्हणाला, “संघ चांगली कामगिरी करत आहे. आज मी संघाची जबाबदारी स्वीकारली. मी आज माझ्या खेळाचा खरोखर आनंद घेतला. मी सातत्याने धावा करत आहे ही चांगली बाब आहे. संघात कुठे सुधारणा करू शकतो याचा विचार आम्ही केला पाहिजे. या पराभवामुळे आम्ही निराश झालो नाही. आम्ही यातून बरेच काही शिकलो आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
धवनच्या शतकी खेळीनंतरही का झाला दिल्लीचा पंजाबविरुद्ध पराभव, जाणून घ्या ५ कारणे
चेन्नईची साडेसाती संपेना! ‘हा’ खेळाडू आयपीएल २०२० हंगामातून झाला बाहेर
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले ३ भारतीय खेळाडू
ऐंशीच्या दशकातील पैसा वसूल सामना.! एकट्या ‘ऍलन लॅम्ब’ यांनी वेस्टइंडीजच्या जबड्यातून विजय खेचला
HBD विरू : तो आला..त्याने पाहिलं..अन् त्याने जिंकलं ! भारतीय क्रिकेटचा खराखुरा ‘सुलतान’