एप्रिल २०२२ महिन्यात फेडरेशन कप राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या ऐश्वर्या मिश्राने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. तिने महिला ४०० मीटर शर्यतीत विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदक आणि २०० मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. तिच्या या यशानंतर तिचे भरपूर कौतुकही केले होते. पण आता ती एका वेगळ्या आणि गंभीर कारणामुळे चर्चेत आली आहे. या स्पर्धेनंतर गेल्या महिन्याभरापासून ऐश्वर्याचा ठावठिकाणा लागलेला नाही.
ही फेडरेशन कप स्पर्धा कोळीकोडे येथे झाली होती. या स्पर्धेनंतर ऐश्वर्याची (Aishwarya Mishra) उत्तेजक चाचणी घेण्यात (Dope Test) येणार होती. तिची ही चाचणी राष्ट्रीय प्रतिबंधक संस्था म्हणजेच नाडा आणि जागतिक ऍथलेटिक्स संघटनेची ऍथलेटिक इंटिग्रिटी युनिट (एआययू) घेणार होते. परंतु, त्यांना गेल्या महिन्यापासून ऐश्वर्याचा चाचणीसाठी नमुने घेण्यासाठी तपास लागलेला नाही. त्याचमुळे सध्या अशी चर्चा आहे की, ऐश्वर्या उत्तेजक चाचणी टाळण्यासाठी बेपत्ता झाली आहे.
विशेष गोष्ट अशी की, ऐश्वर्याने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवलेले नाही. पण तिने फेडरेशन कपमध्ये महिलाच्या ४०० मीटर शर्यतीत तिसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. तिने ५१.१८ सेंकदात ही स्पर्धा पूर्ण करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. तिच्यापेक्षा या स्पर्धेत केवळ हिमा दास (५०.७९ सेकंद) आणि मनजीत कौर (५१.०५) यांनीच चांगली वेळ नोंदवली आहे.
ऐश्वर्या सर्वात आधी ऑक्टोबर २०१९ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत ५२.४० सेकंद वेळ नोंदवल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. त्यामुळे तिची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड झाली होती. पण, नंतर तिची कामगिरी खालावल्याने या शिबिरातून हकलपट्टी करण्यात आली होती. पणनंतर तिने २०२१ मध्ये पुन्हा लक्ष वेधले. तिने आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रासाठी ४०० आणि २०० मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली होती.
तसेच तिने फेडरेशन कपमध्ये केलेली कामगिरी पाहाता तिची तुर्कीमध्ये होणाऱ्या भारताच्या शिबिरासाठीही निवड झाली होती. हे शिबिर राष्ट्रकुल स्पर्धांबरोबर आगामी काही महत्त्वाच्या स्पर्धांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यामुळे देखील तिला ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून देखील संपर्क करण्यात आला, पण तिचा फोन स्विच ऑफ असल्याचीही चर्चा माध्यमांतील वृत्तानुसार समोर येत आहे. तसेच ती सध्या हरियाणामध्ये असल्याचाही कयास लावला जात आहे. मात्र, अद्याप तिचा स्पष्ट पत्ता सापडलेला नाही.
दरम्यान, एखादी धावपटू अशी अचानक गायब होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी निर्मला शेवरन ही देखील काही दिवस बेपत्ता होती. नंतर ती उत्तेजक चाचणीत दोषी सापडली. त्यामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी लागली होती. तसेच तिने २०१७ साली जिंकलेले आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदकही गमावले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई आणि जडेजा यांच बिनसलं? ‘या’ गोष्टीमुळे चर्चेला उधाण
पुष्पा फिवर कमी होईना! आता तर नेपाळच्या महिला क्रिकेटपटूनेही केले ‘झुकेगा नहीं’ सेलिब्रेशन
IPL 2022 | गुजरातने प्लेऑफ गाठले; अन्य ३ जागांसाठी कसे आहे समीकरण, घ्या जाणून